सोलापूर : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेतून शहर- जिल्ह्यातील तीन हजार लाडक्या बहिणींनी स्वेच्छेने बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. त्याऐवजी नियमित मानधन मिळत असल्याने या महिलांनी संजय गांधी निराधार योजनेला प्राधान्य दिले आहे.
लाडकी बहीण योजनेतील सहभागी असलेल्यांना अन्य योजनेचा लाभ घेता येत नाही. महिलांनी संजय गांधी निराधार योजनेचा लाभ कायम ठेवत लाडकी बहीण योजनेला रामराम करत यातून नावे वगळण्यासाठी अर्ज केले आहेत.
लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणारी आर्थिक मदत दरमहा १५०० रुपयांची रक्कम निश्चित वेळेत खात्यावर जमा होत नाही. त्यामुळे गरजेवेळी महिलांची अडचण निर्माण होते. यामुळे शहर-जिल्ह्यातील तीन हजार महिलांनी या योजनेतून आपले नाव वगळण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे संजय गांधी निराधार योजनेचे पैसे नियमितपणे लाभार्थी महिलांच्या खात्यावर जमा होतात. त्यामुळे जिल्ह्यात या योजनेतून स्वेच्छेने नाव वगळणाऱ्या महिलांची संख्या सुमारे तीन हजारांवर पोहोचली आहे.