अमोल साळुंके
सोलापूर : राज्यात जलजीवन मिशन अंतर्गत 51 हजारांपेक्षा जास्त कामे मंजूर आहेत. त्यातील अंदाजे 21 हजार कामे निधीअभावी बंद आहेत. राज्यातील अनेक गावांना उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावीत लागत असून, जलजीवनची कामे पूर्ण करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
राज्यातील गावे, वाडी, वस्त्यांवरील नागरिकांना शुद्ध नळांद्वारे घरात पाणी मिळावे, या उद्देशाने केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त विद्यमाने राज्यात जलजीवन मिशन योजना सुरू केली. सुरुवातीला हजारो गावांमध्ये योजनेचे काम उत्कृष्टरित्या झाले. मात्र, त्यानंतर निधी वेळेवर येत नसल्याने जलजीवन योजनेला जिल्ह्यासह राज्यात घरघर लागली असून, हजारो कामे निधीअभावी बंद ठेवण्यात आली आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलजीवन मिशन योजनेसाठी निधीची घोषणा केली असून, थकीत अनुदान त्वरित देण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे जलजीवनचे थकलेले अनुदान लवकरच येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
राज्यातील अनेक गावात पिण्यासाठी पाण्याची सोय नसल्याने महिला, ग्रामस्थांना पायपीट करावे लागत आहे. त्यामुळे जलजीवन योजनेची कामे पूर्ण करावीत, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. परंतु निधी वेळेवर येत नसल्याने ठेकेदारांनी जलजीवनची कामे बंद ठेवली आहेत. त्याचा फटका जिल्ह्यातील विविध भागातील ग्रामस्थांना बसत असून, तत्काळ जलजीवनची कामे पूर्ण व्हावीत, अशी मागणी त्यांच्याकडून होत आहे.