मोहोळ : मोहोळची शान 'महाराष्ट्र केसरी' सिकंदर शेखने पंजाबमध्ये झालेल्या स्पर्धेत बाजी मारत 'रुस्तुम-ए-हिंद' हा मानाचा किताब पटकावला. हा किताब पटकावणारा सिकंदर हा महाराष्ट्राचा चौथा मल्ल आहे.
पंजाबमधील जांडला (जि.जालंधर) येथे २०२४ च्या 'रुस्तुम-ए-हिंद' स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात देशातील अनेक नामवंत पैलवानांनी सहभाग घेतला होता. मात्र, त्यांना धूळ चारत सिकंदर शेख याने रुस्तुम-ए-हिंद हा किताब पटकविला. या स्पर्धेत सिकंदरची रोशन किरलगड आणि बग्गा कोहली यांच्याबरोबर झालेली कुस्ती रोमहर्षक होती. अंतिम स्पर्धेत सिकंदर विरूध्द बग्गा कोहली यांच्यात कुस्ती झाली यात सिकंदर विजयी झाला. त्याला बक्षीस म्हणून मानाची गदा, ट्रॅक्टर या बक्षिसाबरोबरच आर्थिक स्वरूपातही बक्षीस मिळाले आहे.
'रुस्तुम-ए-हिंद या किताबावर नेहमीच उत्तर भारतीय मल्लांचे वर्चस्व पाहायला मिळाले आहे. पै.हरीशचंद्र बिराजदार,अमोल बुचडे आणि असाब अहमद या तिघांनीच हा किताब आता पर्यत जिंकल्याचे सांगितले जाते. त्यानंतर हा किताब जिंकणारा मोहोळचा सिकंदर शेख हा महाराष्ट्रातील चौथा मल्ल ठरला आहे.
'सिंकंदर शेख याने 'रुस्तम-ए-हिंद किताब' जिंकून महाराष्ट्राचं नाव देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचविले आहे. भविष्यात सिकंदर हा कुस्तीच्या माध्यमातून जगभरात महाराष्ट्राचं आणि देशाचं नाव उंचावेल, अशी आम्हाला खात्री आहे.पुनीत बालन, अध्यक्ष, पुनीत बालन ग्रुप , पुणे