मार्डी : आठशे वर्षांची परंपरा असलेल्या व सर्व जाती धर्मांचे ऐक्य साधणा-या श्रीक्षेत्र मार्डी येथील श्री नागनाथ यात्रेला शुक्रवारपासून (दि.११) सुरुवात होणार असून शुक्रवारी नवमी दिवशी पहिला गण तर रविवारी (दि.१३) दुसरा गण निघणार आहे.
श्रीक्षेत्र माणूर (जि.बीड) येथून आठशे वर्षांपूर्वी भक्त सौ.बातकव्वा मुडके यांच्या भक्तीला प्रसन्न होऊन श्री नागनाथ श्रीक्षेत्र मार्डी येथे आले असल्याची अख्यायिका आहे. सध्या श्री नागेश स्वामी हे खर्गे महाराज आहेत. दरवर्षी अश्विन शुद्ध नवमी व एकादशी या दिवशी जंगम रुपात दर्शन देईन, असा वर श्री नागनाथांनी बातकव्वा यांना दिला. तेव्हापासून ही यात्रा सुरु झाली आहे. शुक्रवार (दि.११) रात्री दहा वाजता खर्गे महाराजांच्या निवासस्थानी आरती झाल्यानंतर मिरवणुकाला सुरुवात होईल. रात्री दोन वाजता गण श्री नागनाथ मंदिरात आल्यानंतर क्षौर, स्नानाधी विधी झाल्यानंतर पहिला संचार बातकव्वांच्या समाधीवर होईल. तिथे भाकणूक होते. त्यानंतर मुडके ओटा, पाटील ओटा, मंदिराचे मुख्य प्रवेश द्वार व देशमुख ओटा याठिकाणी पाऊस, पेरणी, राजकीय परिस्थिती, शांतता आदी प्रश्न विचारुन भाकणूक होते. त्यानंतर गण मार्कंडेय ऋषींच्या दर्शनाला जातात. पहाटे ४ वाजता गावाच्या वेशीत जाळ केला जातो. त्यातून खर्गे महाराज आणि भक्तगण गावात प्रवेश करतात. हाटवट गल्ली येथील नागनाथ मंदिरात धान्य शिवले जाते. शनिवारी (दि. १२) खर्गे महाराजांचा गौरीशंकर मुडके या मानक-यांच्या घरी उपवास सुटतो.
त्यानंतर रविवार (दि. १३) रात्री दहा वाजता दुसरा गण निघणार असून रात्री दहा वाजता गणाची मिरवणूक निघते. पहाटे तीन वाजता गण मंदिरात आल्यानंतर पहिल्या दिवशीप्रमाणेच भाकणूक होते. त्यानंतर खापरीचा पार येथे अन्न उधळण्याचा कार्यक्रम होतो. अज्ञानसिद्धांची आणि गणाची भेट होते. लिंबा-याच्या पानांच्या माळा प्रसाद म्हणून वाटल्या जातात. लिंगायत, ब्राम्हण, मराठा, माळी, न्हावी, तेली, सोनार, चर्मकार या जातींबरोबरच मुस्लिम धर्माला देखील या यात्रेत सेवेचा मान आहे. हर….हर… शेख नसरुद्दीन साहेब की दो चरावो दिन, या जयघोषाने गणादिवशी श्रीक्षेत्र मार्डीचा आसमंत दुमदुमून जातो. भाविकांनी मोठ्या संख्येने यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन सरपंच प्रांजली गणेश पवार, उपसरपंच श्रीकांत मार्तंडे, ग्रामविकास अधिकारी नंदकुमार पाटील यांनी केले आहे.