अक्कलकोट : येथील श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनाकरीता परगावाहून येणाऱ्या स्वामी भक्तांची संख्या प्रचंड वाढत आहे. या अनुषंगाने श्री स्वामी समर्थ महाराज देवस्थान विश्वस्त समितीच्या वतीने येणाऱ्या सर्व भाविकांना लवकरात लवकर व सुलभ स्वामी दर्शन कसे मिळेल यासाठी विविध उपाय योजना राबविण्यात येणार आहेत.
स्वामी भक्तांची संख्या प्रचंड वाढल्याने व मंदीर परिसरातील जागा मर्यादीत असल्याने भाविकांची दर्शन रांग मंदीराबाहेरील रोडवर जात आहे. ही बाब लक्षात घेवून मंदिराच्या दक्षिण महाद्वारालगत वारंवार गर्दीच्या वेळी कापडी मंडप उभारण्यात येतो. दर्शन रांगेत पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात येते. रोडवरील मंदिराबाहेरील वाढती रांग लक्षात घेऊन मंदिरातील गाभाऱ्यासमोरील मंडपातील स्वामी भक्तांना टप्प्या टप्प्याने रांगेत स्वामी दर्शनाकरिता सोडण्यात येते. मंदिर समितीकडून आपल्या मर्यादित मंदिर परिसरातच हे सर्व नियोजन नियमीतपणे व यशस्वीपणे राबविण्यात येत असते.
सद्यस्थितीत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी अक्कलकोट तिर्थक्षेत्र विकास आराखडा जाहीर केल्यानंतर अक्कलकोट तिर्थक्षेत्राचा सर्वांगीण विकास होणार आहे. श्री.वटवृक्ष स्वामी समर्थ महाराज देवस्थान विश्वस्त समितीच्या वतीने आम्ही भाविकांच्या सेवेकरिता सदैव तत्पर असल्याचे स्पष्टीकरण मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी केले.