सोलापूर : लोकसभा, विधानसभा, महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये मिळालेल्या दमदार यशानंतर शिवसेनेने आता संघटन बांधणीवर लक्ष केंद्रीत केले आहे. आगामी काळात मोठ्या निवडणुका नसल्याने पक्षाने संपूर्ण लक्ष संघटना मजबूत करण्यावर केंद्रित केले असून शाखा विस्तार, बूथस्तरीय जाळे सक्षम करणे आणि कार्यकर्त्यांना नवसंजीवनी देण्यासाठी मेळाव्यांची मालिका सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी सोलापुरात पत्रकारांशी संवाद साधताना दिली.
खा. शिंदे यांनी सोमवारी शिवसेना पदाधिकारी आणि सोलापूर लोकसभा, माढा आणि धाराशिव मतदार संघाच्या पक्ष कार्याचा आढवा घेतला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांची संवाद साधला. सोलापूर लोकसभा तसेच माढा, धाराशिव मतदारसंघातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे स्वतंत्र मेळावे घेऊन आगामी राजकीय दिशा, संघटन विस्तार आणि शाखा बळकटीकरणाबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.
जिल्हाप्रमुखांकडून कामकाजाचा नियमित आढावा घेतला जात असून प्रत्येक शाखा अधिक सक्रिय करण्याचे नियोजन सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राज्यात शिवसेना आणखी मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्याला जबाबदारी देत पक्ष विस्ताराची मोहीम राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी मंत्री उदय सामंत, मंत्री गुलाबराव पाटील, खासदार धैर्यशील माने, खासदार डॉ. ज्योती वाघमारे, चंद्रहार पाटील, जिल्हाप्रमुख अमोल शिंदे उपस्थित होते.