पंढरपूर : श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपुरात येणाऱ्या भाविकांना चांगल्या सेवासुविधा मिळाव्यात, भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी शासनाने कॉरिडॉर करण्याचा निर्णय घेतला आहे.
यामध्ये 650 मालमत्ता बाधित होत आहेत. याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे बाधितांचे व्यवसाय बुडणार असून, मठ, वाडे, मंदिरे अशा जुन्या वास्तू नष्ट होणार आहेत. त्यामुळे बाधितांनी कॉरिडॉरला विरोध दर्शवित महाशिवरात्रीनिमित्त महाद्वार घाट येथे असलेल्या सोमेश्वर मंदिरात जाऊन महादेवास साकडे घातले. तसेच डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी कॉरिडॉर रद्द करण्यासाठी घेतलेल्या भुमिकेला शंखनाद करत पाठिंबा दर्शवला आहे.
पंढरपूर येथे कॉरिडॉर होऊ नये यासाठी डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना पत्र लिहिले आहे. डॉ.सुब्रमण्यम स्वामी यांच्या प्रयत्नांना पाठिंबा देण्यासाठी रविवारी महाशिवरात्री निमित्त कॉरिडॉर बाधितांनी घाटाजवळ असलेल्या सोमेश्वर मंदिरामध्ये जाऊन महादेवाची आरती केली. कॉरिडॉर होऊ नये म्हणून महादेवाला साकडे घातले. तसेच श्री कोटेश्वर महादेव मंदिरातही महाआरती करण्यात आली. या आंदोलनात नगरसेवक ओंकार जोशी यांनी सहभाग घेवून कॉरिडॉरची आजपर्यंतची सर्व प्रक्रिया बेकायदेशीर आहे. त्यामुळे आमचा कॉरिडॉरला विरोध असल्याचे सांगितले.
याप्रसंगी कॉरिडॉर बचाव समितीचे अध्यक्ष अभयसिंह इचगावकर, उपाध्यक्ष ह. भ. प. माऊली महाराज गुरव, नगरसेवक ओंकार जोशी, वैभव बडवे, व्यंकटेश गलगलकर, अँड. विनायक उंडाळे, गणेश लंके, बालाजी महाजन, यशवंत बेणारे, धनंजय बडवे, बबन भागानगरे, वैष्णवी बडवे उपस्थित होते.
शासनाने गांभीर्याने विचार करावा
पंढरपूर तीर्थक्षेत्र बचाव समिती व पदाधिकारी हे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र बनविण्यासाठी नागरिक, भाविकांच्या नेमक्या गरजा ओळखून अधिकाधिक चांगल्या सूचना, प्रकल्प सादर करतील. त्याचा शासनाने गांभीर्याने विचार करावा, असे आवाहन तीर्थक्षेत्र बचाव समितीचे अध्यक्ष अभयसिंह इचगांवकर यांनी केले आहे.