सोलापूर : कार्यरत शिक्षकांसाठी उत्तर प्रदेश, तमिळनाडू आणि कर्नाटकच्या धर्तीवर महाराष्ट्रात स्वतंत्र शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) घेण्यात यावी, तसेच ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी किमान ४० टक्के गुणांची अट ठेवावी, अशी मागणी शिक्षक भारती संघटनेने केली आहे. या मागणीसाठी राज्यभर आंदोलन उभारण्यात येणार असल्याची माहिती शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष सुजितकुमार काटमोरे यांनी दिली.
सर्वोच्च न्यायालयाच्या १ सप्टेंबर २०२५ रोजीच्या निर्णयानुसार २०१३ पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांनाही टीईटी उत्तीर्ण होणे बंधनकारक करण्यात आले आहे. यापूर्वी शिक्षण हक्क कायदा (आरटीई) २००९ अंतर्गत १३ फेब्रुवारी २०१३ नंतर नियुक्त झालेल्या शिक्षकांसाठीच टीईटीची अट लागू होती. त्यामुळे शिक्षकांना टीईटी देणे बंधनकारक झाले आहे.
कार्यरत शिक्षकांकडे नोकरीसाठी आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता असून अनेक वर्षांचा अध्यापनाचा अनुभवही आहे. त्यामुळे त्यांना नव्याने स्पर्धा परीक्षेच्या धर्तीवर कठीण टीईटी परीक्षा देण्यास भाग पाडणे योग्य नसल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.