माढा : सीना-कोळेगाव धरणातून शेतकऱ्यांसाठी पाणी सोडण्याच्या मागणीला वेग आला असून, याबाबत आज माढा तहसील कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. तहसीलदार संजय भोसले यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीस महसूल विभाग, पाटबंधारे विभाग, महावितरणचे अधिकारी, उपोषणकर्ते मुन्ना साठे तसेच शेतकरी उपस्थित होते.
बैठकीत सीना-कोळेगाव धरणातील उपलब्ध पाणीसाठ्याचा आढावा घेण्यात आला. धरणातील पाणी गरजू भागांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी आवश्यक नियोजनावर चर्चा करण्यात आली. पाणी सोडताना वितरण व्यवस्था आणि शेवटच्या टोकावरील शेतकऱ्यांपर्यंत पाणी पोहोचण्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजनांवर भर देण्यात आला.
पाणी उपसा केंद्रे व कालव्यांच्या व्यवस्थापनासाठी आवश्यक असलेल्या वीजपुरवठ्याबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करण्यात आली. पाणी सोडण्याच्या कालावधीत संबंधित केंद्रांना अखंडित वीजपुरवठा देण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.
पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी धरणाचे दरवाजे उघडणे, पाण्याचा प्रवाह सुरळीत ठेवणे तसेच कालव्यांची साफसफाई व दुरुस्ती याबाबतची माहिती दिली. धरणातून सोडलेले पाणी शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावे यासाठी महसूल, पाटबंधारे आणि महावितरण या तीनही विभागांनी परस्पर समन्वयाने काम करण्याचे ठरविण्यात आले.