सांगोला : काही महिन्यांपासून सांगोला शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात चोऱ्या आणि घरफोड्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. अशा घटना वारंवार घडत आहेत. अधूनमधून लोकांना रस्त्यात अडवून लुटमारीच्या घटना देखील घडल्या आहेत. या घरफोडीच्या व चोऱ्यांचा तपास लागत नाही.
वारंवार होत असलेल्या चोऱ्यांमुळे शहर आणि तालुक्यातील लोक हे भयभीत झाले आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्याने याची तत्काळ दखल घेऊन सांगोला तालुक्यात गस्त वाढवावी. झालेल्या चोऱ्यांचा तपास लावावा व चोऱ्या होऊ नयेत, यासाठी पोलिस यंत्रणा सतर्क करावी, अशी मागणी जनतेमधून होत आहे.
सांगोला शहरात अगदी भर दिवसा वर्दळीच्या ठिकाणावरून देखील लोकांच्या कमाईवर चोरटे आपला हात साफ करीत आहेत. अनेक घटना सांगोला शहरात देखील भरदिवसा घडलेल्या आहेत. सांगोला पोलिस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर देखील अशा घटना घडत असताना पोलिस यंत्रणा चोरट्यांना पकडण्यात किंवा त्यांच्यावरती कारवाई करण्यात सपशेल अपयशी ठरले आहेत. त्यामुळे लोकांच्या मनामध्ये चोरट्यांची दहशत बसली आहे.
गेल्या महिन्यात छत्रपती शिवाजी चौकातील चोरट्याने दुचाकीच्या बंद डिकीतून शेतकऱ्याचे पैसे पळविले होते. त्यानंतर मार्केट यार्ड जवळील पेट्रोलपंपाजवळ चारचाकीची काच फोडून चोरट्यांनी हात साफ केला. या घटना ताज्या असतानाच मार्केट यार्ड येथे उघड्या काचेमध्ये हात घालून वाहनांमधील चोरट्याने शेतकऱ्याचे अडीच लाख रुपये लंपास केले आहेत.
शहरातील दुकान रात्रीच्यावेळी फोडून २८ हजार रुपयांचे किराणा साहित्य चोरून नेते असताना महुद, जवळा, आगलावेवाडी आणि मेडशिंगी येथून बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी रोख रक्कम, सोने-चांदी दागिने चोरून नेले आहेत. तर दोन दिवसापूर्वी भरधाव स्कार्पिओमधून येऊन एका डाळिंब व्यापाऱ्याला शस्त्राचा धाक दाखवून रात्र व्हायच्या अगोदरच रोख रकमेसह सोन्याचे दागिने हिसकावून नेले. अशा अनेक चोरीच्या घटना घडल्या आहेत.