पंढरपूर : राज्य शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीतील जाचक अटीशर्तीमुळे बहुतांश शेतकरी या कर्जमाफीपासून वंचित राहणार आहेत. सरकारने टाकलेल्या जाचक अटी-शर्ती काढून अन्नदात्याला विनाअट सरसकट कर्जमाफी मिळावी. कर्जाचे पुनर्घटन करावे, यासाठी आज (दि. १२) सकाळी नऊ वजल्यापासून येथे आ. रोहित पवार हे अन्नत्याग आंदोलन करणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे जय्यत तयारी करण्यात आली आहे.
दरम्यान, तीर्थक्षेत्र पंढरपुरात अधिक मासामुळे गर्दी आहे. त्यामुळे यंत्रणेवर ताण आहे. अशातच आ. पवारांनी उपोषणाचा विचार करावा. आम्ही त्यांच्याशी चर्चा करू असे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांनी सांगितले. या आंदोलनास प्रशासनाने गुरूवारी रात्री उशीरापर्यंत परवानगी दिलेली नाही. एकतर जाचक अटी शर्ती काढा अन्यथा अन्नत्याग आंदोलनाला परवानगी द्या. परवानगी नाही दिली तर श्री विठ्ठल मंदिराच्या नामदेव पायरीजवळ आंदोलन करु, अशी भूमिका आ. पवार यांनी घेतली आहे.
या मागण्यांसाठी आंदोलन
- २०१९ च्या कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना केवळ ५० हजारांपर्यंतच्या कर्जमाफीची मर्यादा घालण्यात आली आहे. ही अट रद्द करावी. सर्व शेतकऱ्यांना सरसकट दोन लाखांपर्यंत कर्जमाफी द्यावी.
- २०१९ च्या कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांवर ५० हजारांची मर्यादा सरकारने आता घातली आहे. ती हटवून त्यांनाही सरसकट दोन लाखांपर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळावा
- २०१७ च्या कर्जमाफीसाठी पात्र असूनही केवळ कागदपत्रांभावी लाभ मिळण्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ कर्जमाफी मंजूर करण्यात यावी
- पिकविमा योजनेतील शेतकरी विरोधी जाचक ‘ट्रिगर’ अटी काढून टाकून, ‘१ रुपयांत पिकविमा योजना’ पुन्हा लागू करण्यात यावी
- चालू हंगामाच्या पेरणीपूर्वी सर्व शेतकरी कर्ज खात्यांचे पुनर्गठन करून शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रक्कम जमा करण्यात यावी