सोलापूर : जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी बार्शीचे माजी आ. राजेंद्र राऊत यांचे समर्थक दीपक वैद्य यांची, तर उपाध्यक्षपदी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांचे बंधू उत्तर सोलापूरचे इंद्रजित पवार यांची निवड झाली. त्यामुळे विधान परिषद निवडणुकीतून राऊत, पवार यांचा पत्ता कट झाल्याची चर्चा आहे.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीनंतर जिल्ह्याच्या राजकारणात नव्या समीकरणांना सुरुवात झाली आहे. या निवडीमुळे माजी आ. राऊत आणि पवार यांचा विधान परिषद निवडणुकीतील मार्ग बंद झाला असून, माजी आ. प्रशांत परिचारक, राजन पाटील, दिलीप माने यांच्यापैकी एकाला संधी मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. मात्र, भाजप पक्षश्रेष्ठी ऐनवेळी कोणाच्या गळ्यात विधान परिषद सदस्यत्वाची माळ घालतील याविषयी जिल्हाभर उत्सुकता आहे.
पालकमंत्र्यांची भूमिका महत्त्वाची
पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी नगरपालिका, महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत भाजपला यश मिळवून दिले. विधान परिषद निवडणुकीत स्थानिक स्वराज्य संस्थांवर निवडून आलेले सदस्य, नगरसेवक मतदान करतात. त्यामुळे या निवडणुकीत पालकमंत्र्यांची भूमिका महत्त्वाची असून, त्यांच्याकडेच सर्व इच्छुक लॉबिंग करत आहेत. विधान परिषदेसाठी कोणाचे नाव पालकमंत्री गोरे निश्चित करणार याची उत्सुकता आहे.