पंढरपूर : राज्यातील शेतकर्यांची संपूर्ण कर्जमुक्ती, राज्यातील जनतेवर अन्यायकारक असणारा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची सदबुध्दी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुचावी. यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी व विधीमंडळातील गटनेते आमदार सतेज पाटील, खासदार प्रणिती शिंदे यांनी पंढरपूर येथील आराध्य दैवत विठ्ठलास साकडे घातले.
मुख्यमंत्री फडणवीस रविवारी (दि. 6) पंढरपूर येथे श्री विठ्ठल रुक्मिणीची सपत्नीक शासकीय महापूजा करणार आहेत. या पुजेच्या आधी मुख्यमंत्र्यांनी विधानसभा निवडणुकीत दिलेला राज्यातील शेतकर्यांचा सातबारा कोरा करून संपूर्ण कर्जमुक्तीच्या निर्णयाची तातडीने अमलबजावणी करावी. राज्यातील जनतेवर व शेतकर्यांवर अन्यायकारी ठरणारा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची सुबुध्दी सुचावी, या मागणीसाठी शेतकर्यांनी गर्दी केली होती.
छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सर्व शेतकरी एकत्रित येत विठ्ठल मंदिरासमोरील नामदेव पायरीवर विठ्ठलास अभिषेक घालून साकडे घातले. यावेळी राजू शेट्टी, आ. सतेज पाटील, खा. प्रणिती शिंदे यांनी शेतकर्यांचा सातबारा कोरा झालाच पाहिजे, अन्यायकारक शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे, अशा घोषणा देत मंदिर परिसर दणाणून सोडला. यावेळी शेतकरी संघटनेचे सचिन पाटील, रवी मोरे, तानाजी बागल, दामू इंगोले, विजय रणदिवे, किशोर ढगे, शिवाजी पाटील, अजित बोरकर, किरणराज घाडगे, प्रताप गायकवाड, संदीप पाटील, राहुल पाटील, महादेव शिंदे, अजिनाथ परबत, सचिन ताटे, नितीन शिंदे, शहाजहान शेख, बंडू सावळे, नामदेव पवार यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राज्य सरकारला जर शेतकर्यांची कर्जमाफी करण्यास व शक्तीपीठ रद्द करण्याची सुबुद्दी सुचली नाही तर सरकारच्या विरोधात लढण्याची ताकद आम्हाला द्यावी, असे साकडे राजू शेट्टी, आ. सतेज पाटील, खा. प्रणिती शिंदे यांनी घातले.
शेतकर्यांनी, भाविकांनी मागणी न केलेला शक्तीपीठ महामार्ग शेतकर्यांच्या माथी मारला जात आहे. 32 हजार कोटी रुपयांमध्ये तयार होणारा रस्ता 86 हजार कोटींमध्ये तयार करुन 50 हजार कोटींचा भ्रष्टाचार करण्यासाठी हा महामार्ग बांधणीचा घाट घातला आहे. पोलीसांच्या मदतीने जमीन मोजण्याचा प्रयत्न केला जात असल्याची टिका शेट्टी यांनी केली.