माढा : अंजनगाव खे. (ता. माढा) येथील शेतकरी विश्वनाथ हरिभाऊ पांढरे यांच्या शेतातील द्राक्षबाग भेसळयुक्त खतामुळे मोठ्या प्रमाणात जळाल्याची घटना घडली. याबाबत आमदार अभिजित पाटील यांनी प्रत्यक्ष शेतात भेट देऊन पाहणी केली. संबंधित खत कंपनीचे प्रतिनिधी तसेच कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना आमदार पाटील यांनी जळीत झालेल्या द्राक्षबागेबाबत सविस्तर माहिती घेऊन तत्काळ कार्यवाहीच्या सूचना दिल्या.
सदर खताचे नमुने हैदराबाद येथील अधिकृत प्रयोगशाळेत पाठवून सखोल चौकशी करण्यात यावी. तसेच दोषी आढळणाऱ्या कंपनीवर कठोर कारवाई करण्यात यावी, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले. कृषी विभागातील अधिकाऱ्यांना याप्रकरणी तत्काळ कार्यवाही करून संबंधितांना लेखी नोटीस देण्याबाबत सूचना देण्यात आल्या असून, बाधित शेतकऱ्यांना योग्य ती नुकसान भरपाई देण्याबाबतही स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत.
यावेळी नितीन कापसे, तालुका कृषी अधिकारी चंदन, कृषी गुणवत्ता नियंत्रण अधिकारी गावडे, विनंती कुलकर्णी, योगेश पाटील, नागेश इंगळे, दत्तात्रय पाटेकर, समाधान इंगळे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.