सोलापूर : मे महिना हा तीव्र उन्हाचा असतो. यातून उष्माघाताची भीतीसुध्दा असते. उन्हाळ्यात उन्हाचा सर्वाधिक त्रास हा गरोदर महिलांना होऊ शकतो. वाढते तापमान व उकाड्याने शरीरातील पाण्याची पातळी कमी (डिहायड्रेशन) होण्याचा धोका असतो. शिवाय, थकवा येणे अशा समस्या उद्भवतात. मात्र, या दरम्यान योग्य आहार, विहार आणि नियोजन या साध्या गोष्टींची काळजी घेतल्यास उन्हाळा सुरक्षित व अधिक सुखकर जाऊ शकतो.
उन्हाळ्यात शरीरातील पाण्याचे प्रमाण संतुलित ठेवावे लागते. शरीरातील पाण्याची कमतरता ही आई व बाळ या दोघांसाठी घातक ठरू शकते. म्हणून, दिवसभर पुरेसे पाणी पिणे आवश्यक आहे. केवळ पाणीच नाही, लिंबूपाणी, शहाळ्याचे पाणी यासह ताज्या फळांच्या रसाचा समावेश आहारात असावा.
उन्हाळा संपेपर्यंत साधारणतः सकाळी अकरा वाजल्यापासून ते दुपारी साडेचार या दरम्यान घराच्या बाहेर पडणेही टाळावे. वाढत्या उन्हाचा त्रास माणसांसह प्राणी व पक्ष्यांनाही होतो. प्राणी व पक्षीही या दिवसात दाट सावलीसाठी झाडांच्या व पाण्याच्या शोधात भटकतात.
थोड्या थोड्या अंतराने जेवावे
उन्हाने अन्न खराब होते. म्हणून ताजे व व्यवस्थित शिजवलेले अन्नच खावे. एकाच वेळी जास्त जेवण्याऐवजी थोड्या थोड्या अंतराने जेवावे. अशा प्रकारे जेवल्यास शरीरातील ऊर्जा टिकून राहते. तसेच रक्तातील साखरेचे प्रमाणही संतुलित राहते. बाहेरील उघड्यावरचे अन्न व कापलेली फळे खाऊ नये. टरबूज, खरबूज व संत्री यांसारख्या फळांचा आहारात समावेश करावा.
अशी घ्यावी काळजी...
उष्णतेचा त्रास कमी करण्यासाठी सैल व सुती कपडे वापरावेत. सिंथेटिक कपड्यांमुळे घाम साचून त्वचेचे विकार होऊ शकतात.
दुपारी 12 ते 5 या कडक उन्हाच्या वेळेत बाहेर जाणे टाळावे. बाहेर जाणे अनिवार्य असल्यास छत्रीचा वापर करावा.
कडक उन्हात फिरण्याऐवजी सकाळी लवकर किंवा संध्याकाळी थंड वातावरणात हलका फेरफटका मारणे आरोग्यासाठी उत्तम ठरते.
पुरेसे पाणी, सुती कपडे, ताजा आहार आणि योग्य विश्रांती हीच उन्हाळ्यातील सुरक्षित गरोदरपणातील गुरुकिल्ली आहे.