सोलापूर : महाराष्ट्रातील २०२६ च्या खरीप हंगामासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेची अंमलबजावणी एचडीएफसी ॲग्रो जनरल इन्शुरन्स कंपनीमार्फत करण्यात येणार आहे.
ही योजना सोलापूरसह अकोला, धुळे, हिंगोली, जळगाव, पुणे आणि सातारा जिल्ह्यांतील कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी लागू असून, अर्ज करण्याची अंतिम मुदत ३१ जुलै २०२६ आहे. या योजनेअंतर्गत दुष्काळ, अतिवृष्टी, पूर, गारपीट, वादळ, चक्रीवादळ, कीड, रोग तसेच इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या पीक नुकसानीस विमा संरक्षण मिळणार आहे.
पीक उत्पादनाचे मूल्यांकन पीक पाहणीच्या आधारे केले जाणार असून, नुकसान झाल्यास पात्र शेतकऱ्यांना विमा भरपाई दिली जाईल. योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी संबंधित बँका, महा-ई-सेवा केंद्रे किंवा अधिकृत प्रतिनिधींशी संपर्क साधू शकतात. तसेच कृषी विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावरूनही नोंदणीची सुविधा उपलब्ध असून, अधिकाधिक शेतकऱ्यांनी ३१ जुलैपूर्वी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.