पंढरपूर : आषाढी, कार्तिकी, चैत्री व माघ यात्रेला पंढरपूर शहरात येणाऱ्या भाविकांना अडचणीचे ठरू नये. तसेच शहरातील नागरिकांची गैरसोय होऊ नये, म्हणून क्रांतिसिंह नाना पाटील चौक ते अर्बन बँकेपर्यंत उड्डाणपूल तयार करण्यात येत आहे. याचे कामही चालू आहे. परंतु काही दिवसांपूर्वी या उड्डाणपुलास व्यापाऱ्यांनी विरोध दर्शविला आहे. असे असले तरी उड्डाणपूल होणे गरजेचे आहे. दोन भागात विभागलेले शहर एकत्र जोडण्यासाठी उड्डाणपूल महत्त्वाचा आहे. म्हणून सोमवारी भाजप नगरसेवकांनी प्रांताधिकारी सचिन इथापे यांची भेट घेऊन उड्डाणपुलाचे काम लवकर मार्गी लावावे, अशी मागणी केली.
आषाढी यात्रेत संतांचे पालखी सोहळे पंढरपूरला येतात. तेव्हा सरगम चौक याठिकाणी येणाऱ्या भाविकांची गैरसोय होते. तसेच प्रत्येक पावसाळ्यात सरगम चौक पुलाखाली मोठ्या प्रमाणात पाणी साचते. यामुळे विद्यार्थी, नागरिक यांना त्रास सहन करावा लागतो. म्हणून माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन पंढरपुरात क्रांतिसिंह नाना पाटील चौक ते अर्बन बँकेपर्यंत उड्डाणपूल तयार करण्यात यावा, अशी मागणी केली होती. यास मंत्री गडकरी यांनी चांगला प्रतिसाद देऊन या कामास मंजुरी दिली.
सध्या उड्डाणपुलाचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र भोसले चौक परिसरातील काही व्यापाऱ्यांनी उड्डाणपुलाला विरोध दर्शवून आंदोलन केले होते. यामुळे उड्डाणपूल रद्द करण्यात आला, अशी अफवा पसरविण्यात आली होती. भाजपचे उपनगराध्यक्ष महादेव धोत्रे, नगरसेवक सुनील वाळूजकर, अमोल डोके, सुजित सर्वगोड तसेच इतर नगरसेवकांनी प्रांताधिकारी सचिन इथापे यांची भेट घेतली. उड्डाणपुलाचे काम तत्काळ मार्गी लावावे, अशी मागणी केली आहे.