सुरेश गायकवाड
पंढरपूर : केंद्र सरकारच्या ‘नमामि गंगे’च्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली ‘नमामी चंद्रभागा’ योजना ही महत्त्वाकांक्षी नदी शुद्धीकरण व संवर्धन मोहीम प्रशासनाच्या अनास्थेमुळे कागदावरच रखडली आहे.
या योजनेचा मुख्य उद्देश चंद्रभागा (भीमा) नदी आणि तिच्या उपनद्या प्रदूषणमुक्त करणे हा आहे. मात्र, अद्याप या योजनेचे काम प्रत्यक्ष सुरू न होता निधीअभावी ही योजना कागदावरच आहे. नमामी चंद्रभागा अभियानांतर्गत एकूण ४८.२५ कोटी रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यापैकी महाराष्ट्र शासनाने आतापर्यंत ३४.६५ कोटी रुपयांचा निधी दिला. या योजनेची सुरुवात झाली, तेव्हा सुरुवातीच्या अर्थसंकल्पात प्राथमिक कामांसाठी २० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली होती. यातून सांडपाणी व्यवस्थापन करण्याचे नियोजित आहे.
निधीचा मोठा हिस्सा पंढरपूर शहर आणि भीमा नदीच्या खोऱ्यातील आजूबाजूच्या गावांचे सांडपाणी नदीत जाण्यापासून रोखण्यासाठी जलप्रक्रिया प्रकल्प (STP) उभारण्यावर खर्च केला जात आहे. त्यानुसार नदीकाठच्या सुमारे १२० गावांमध्ये सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापनासाठी स्वच्छ भारत मिशनच्या निधीतून अतिरिक्त कामे हाती घेण्यात आली आहेत. कामे झाली नसल्याने ‘नमामी चंद्रभागा’ प्राधिकरणाला २०२७ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.