पंढरपूर : राजकारण, समाजकारणा बरोबरच तितक्याच तळमळीने आणि मेहनतीने शेती व्यवसाय करणारे मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी केशर आंब्याची शेती यशस्वी केली आहे. पहिल्याच वर्षी बागेतून जवळपास 20 टन केशर आंब्याचे उत्पादन मिळाले आहे. राजकारणातील अनुभव थोडा कटू असला तरी शेतातील आमराईने मात्र तो अधिक गोड केल्याची भावना दिलीप धोत्रे यांनी यानिमित्ताने व्यक्त केली आहे.
अत्यंत कष्टाने आणि तितक्याच जिद्दीने राजकारणात आलेले धोत्रे यांना लहानपणापासूनच शेतीची आवड आहे. वडिलोपार्जीत शेती कमी असल्याने त्यांनी करकंब व परिसरात शेतीचा विस्तार वाढवला आहे. यापूर्वी देखील शेतीमध्ये विविध प्रयोग केले आहेत. त्यानंतर आता केशर आंबा लागवडीचा प्रयोग यशस्वी केला आहे. धोत्रे यांनी करकंब येथे खडकाळ माळरानामध्ये मागील तीन वर्षांपूर्वी पाच एकर क्षेत्रावर केशर आंब्याची लागवड केली. लागवडीनंतर पाणी, खते यांचे योग्य व्यवस्थापन करुन माळरानावर आमराई फुलवली.
यावर्षी पाच एकरावरील झाडांना आंबे लगडले आहेत. रसाळ आणि चवीला स्वमधूर असलेल्या केशर आंब्याची नुकतीच काढणी करण्यात आली. पाच एकरामध्ये सुमारे 15 ते 20 टन आंब्याचे उत्पादन मिळाले आहे. सध्या बाजारात केशर आंब्याला चांगली मागणी असल्याने सरासरी एक किलोला 100 रुपयांचा भाव मिळाला आहे.
दिलीप धोत्रे यांनी सांगितले की, राजकीय जीवनात काम करत असलो तरी मूळपिंड शेतकरी आहे. शेतीची लहानपणापासून आवड आहे. त्यातूनच शेतीत विविध प्रयोग करण्याचा छंद आहे. तीन वर्षांपूर्वी केशर आंबा लागवड केली. त्यातून यावर्षी 20 टन आंब्याचे उत्पादन झाले आहे. शेतातील पहिल्या केशर आंब्याची पेटी लवकरच मी मनसेचे नेते राज ठाकरे यांना घेऊन जाणार आहे.