पंढरपूर : जालना येथून विठ्ठलच्या दर्शनासाठी आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीमध्ये स्नानासाठी गेला असता पाण्यात बुडून मृत्यू झाला. त्याला नदीपात्रातील खड्ड्याचा व पाण्याचा अंदाज आला नसल्याने मंगळवार, दि. 5 रोजी सकाळी ही दुर्घटना घडली. शिवराज इथारे (वय 18, रा. जालना) असे तरुणाचे नाव आहे. नातेवाईकांनी होडी बांधवांनी त्याला पाण्यातून बाहेर काढले; मात्र उपचारासाठी दाखल केले असता, तो मृत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. वाळू उपशाने या आठवड्यातील ही दुसरी दुर्घटना घडल्याचा आरोप भाविक करत आहेत.
शिवराज इथारे हा नातेवाईकासह सकाळी नदीमध्ये पवित्र स्नानासाठी गेला होता; मात्र खड्ड्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला. ही बाब लक्षात येताच नातेवाईकांनी आरडाओरडा सुरू केला. होडीचालकांनी त्याला पाण्यातून बाहेर काढले; मात्र रुग्णवाहिका वेळेत उपलब्ध झाली नाही. त्यामुळे उपजिल्हा रुग्णालयात नेऊन उपचार मिळण्यास उशीर झाला, तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला झाला.
चंद्रभागा नदीच्या किनाऱ्यावर पंढरपूर नगरपरिषद व विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती यांनी आपत्ती व्यवस्थापनअंतर्गत टीम ठेवणे गरजेचे आहे. मात्र, टीम ठेवली नाही. तसेच रुग्णवाहिका वेळेत मिळाली नसल्यामुळे भाविकाचा मृत्यू झाला असल्याचा आरोप माजी नगरसेवक विक्रम शिरसट यांनी केला आहे.