पंढरपूर : श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपूरला आषाढी आणि कार्तिकी एकादशीला लाखो आणि दररोज मोठ्या प्रमाणात भाविक येतात. भाविकांना व स्थानिक नागरिकांना पायाभूत सुविधा मिळाव्यात, यासाठी विकास आराखडा तयार करण्यात येणार आहे.
विकास आराखडा तयार करताना लोकप्रतिनिधी, स्थानिक नागरिक, व्यापारी, वारकर्यांना विश्वासात घेऊन, त्यांच्याशी जिल्हा प्रशासनाकडून चर्चा करण्यात आल्याने कॉरिडॉरला होणारा विरोध मावळू लागला आहे. पंढरपूरचा विकास आणि मिळणारा जादा मोबदला यामुळे 80 टक्के नागरिकांनी कॉरिडॉरच्या बाजूने आपली भूमिका दर्शवली आहे.
कॉरिडॉरबाबत स्थानिक नागरिक, व्यापारी, विक्रेते यांच्याशी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पंढरपुरात येऊन मंदिर परिसरातील 800 लोकांशी प्राथमिक चर्चा केली. अडीअडचणी जाणून घेतल्या. कॉरिडॉर का गरजेचा आहे, बाधित होणार्या मालमत्ताधारकांना काय सुविधा देता येतील, जास्तीचा मोबदला देण्याचे मान्य करत पंढरपूरचा विकास करण्यावर भर देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
कॉरिडॉरसाठी जबरदस्तीने भूसंपादन केले जाणार नाही. मंदिर परिसर भागातील सर्वेक्षण करण्यात येणार आहे. यात मालमत्ताधारक, व्यापारी, विक्रेते यांचे असणारे एकूण क्षेत्र, व्यवसाय त्यातून मिळणारे उत्पन्न याची माहिती घेतली जाणार आहे. या माहितीच्या आधारे डाटा तयार करण्यात येऊन त्याबाबत पॅकेज तयार करण्यात येणार असल्याचा विश्वास जिल्हाधिकार्यांनी दिला.
दरम्यान, काशी येथे राबवण्यात आलेला कॉरिडॉर यशस्वी ठरला आहे. येथील पथकाने पंढरपुरात येऊन पाहणी केली आहे. जुने ऐतिहासिक मठ, मंदिर व समाधी यांची पाहणी केली आहे. या पथकाचा अहवाल आल्यानंतर तो नागरिकांसमोर ठेवण्यात येणार आहे. यावर नागरिकांची मते जाणून घेवून पुढील दिशा जिल्हा प्रशासन ठरवणार आहे. हे पथक पुढील आठवड्यात पुन्हा सर्व्हे करणार आहे.