पंढरपूर : उजनी धरण पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस झाल्याने शुक्रवारी दुपारी उजनी धरणातून ८० हजार क्युसेक तर वीर धरणातून ६३ हजार ३२३ क्युसेकचा विसर्ग असा एकूण एक लाख ४३ हजार ३२३ क्युसेक विसर्ग सुरू आहे.
वीर धरणातून नीरा नदी पात्रात सोडलेला हा विसर्ग नीरा नरसिंहपूर (संगम) येथे भीमा नदीत मिसळत आहे. हाच विसर्ग पंढरपूर येथे मध्यरात्री दाखल होणार आहे. त्यामुळे व्यासनारायण झोपडपट्टीत व संत पेठेत काही भागात पाणी शिरण्याची शक्यता आहे. यामुळे प्रशासनाने या परिसरातील नागरिकांचे स्थलांतर सुरू केले आहे.
तलाठी व मंडलाधिकारी यांनी भीमा नदीकाठच्या गावांना व वाड्या-वस्त्यांना, पंढरपूर शहरातील चंद्रभागा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तर पोलिस प्रशासनाने चंद्रभागा नदीच्या घाटावर व नदीपात्रात प्रवेश बंदी केली आहे. पंढरपूर शहरातील व्यासनारायण झोपडपट्टीत पाणी शिरणार आहे. त्यामुळे नगरपालिका प्रशासनाने तात्पुरते निवारा केंद्र सज्ज ठेवावेत. आपत्कालीन परिस्थितीत बोट व जीव रक्षक साहित्य तयार ठेवले आहे. नियंत्रण कक्ष २४ तास कार्यान्वित ठेवावा, अशी सूचना ही प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी दिल्या.