सोलापूर : जिल्हा परिषदेकडून आषाढी वारीची पूर्वतयारी सुरु आहे. यंदाच्या वर्षी पालखी मार्गावर ५०० स्नानगृहासह इतर सर्व मूलभूत सोयी-सुविधा देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य, उपाध्यक्ष इंद्रजीत पवार आणि सीईओ कुशल जैन यांनी सांगितले.
आषाढी वारी तयारी विषयी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वैद्य, उपाध्यक्ष पवार, सीईओ जैन यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यालयात मंगळवारी (दि. २३) पत्रकार परिषदेत घेतली. त्यावेळी त्यांनी माहिती दिली.
अध्यक्ष वैद्य म्हणाले, आषाढी वारी २०२६ च्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषदेकडून व्यापक तयारी सुरू करण्यात आली आहे. ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली आहे. वारकऱ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला आहे.
यंदाची आषाढी यात्रा २५ जुलै रोजी देवशयनी आषाढी एकादशीला होणार आहे. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांसह इतर प्रमुख १० मानाच्या पालख्या पंढरपुरात दाखल होणार आहेत. आषाढी वारीत लाखो वारकऱ्यांच्या उपस्थिती राहणार आहे. त्यामुळे पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य सेवा, रस्ते दुरुस्ती, तात्पुरती निवास व्यवस्था आणि वाहतूक नियंत्रण यासाठी विशेष नियोजन करण्यात आहे.
वारकऱ्यांना सर्व सोयी-सुविधा देणार : उपाध्यक्ष पवार
पालखी मार्गावर वारकऱ्यांचा मूलभूत सोयी-सुविधा देण्यात येणार आहे. तसेच वारकऱ्यांना चालत येताना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी पालखी मार्गावरील सर्व रस्त्यांची कामे करण्यात येणार आहे. त्यासाठी शासनाकडे सहा कोटींचा निधी मागितला आहे. त्यातील एक कोटींचा निधी डीपीसीतून मिळाला आहे. आणखी निधी लवकरच मिळणार असल्याचे उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांनी सांगितले.
७०० फूट अन् काफ मसाजरची सोय : सीईऔ जैन
आषाढी वारीसाठी जिल्ह्यात लाखो वारकरी पायी चालत येत असतात. त्यांच्या पाय आणि पिंढरीचा मसाज होण्यासाठी 700 फूट अन् काफ मसाजरची सोय करण्यात आली आहे. त्यामुळे वयोवृद्ध वारकऱ्यांना त्याचा चांगला फायदा होणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी सांगितले.