सोलापूर : उत्तर प्रदेश येथील प्रयागराज येथे 144 वर्षांनंतर होत असलेल्या महाकुंभ मेळाव्यासाठी देशभरातून कोट्यवधी भाविक जात आहेत. भारतीय रेल्वेने देशातील सर्व कानाकोपर्यातून खास रेल्वेची सेवा सुरू केली आहे. मध्य रेल्वेने पुणे, मुंबई वगळता पश्चिम महाराष्ट्रातून एकही गाडी सोडली नाही, हे दुर्दैव आहे. वारंवार मागणी करूनही प्रवाशांच्या मागणीकडे मध्य रेल्वेकडून कानाडोळा केला जात असल्याचे प्रवाशांनी ‘पुढारी’शी बोलताना सांगितले.
प्रयागराज येथे होत 13 जानेवारीपासून महाकुंभमेळास सुरुवात झाली. महाकुंभची सांगता 26 फेब्रुवारी महाशिवरात्री रोजी होणार आहे. कुंभमेळ्यात स्नान करण्यासाठी येणार्या भाविक, पर्यटकांची संख्या वाढली आहे. महाकुंभ मेळ्याची सांगता होण्यासाठी तीन ते चार दिवस शिल्लक राहिले आहेत. यामुळे प्रयगराजला जाणार्या सर्वच रेल्वे, खासगी वाहनांना गर्दी झाली आहे. मागणी असतानाही मध्य रेल्वे प्रशासनाने सोलापूर विभागासह पश्चिम महाराष्ट्रातून एकही गाडी सुरू न केल्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील भाविकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. पश्चिम महाराष्ट्रातून धावणार्या गाड्या या दक्षिण पश्चिम रेल्वेकडून सोडल्या आहेत. या गाड्या मिरज, दौंड, सोलापूर, अहिल्यानगर मार्गे धावत आहेत. यातून पश्चिम महाराष्ट्रातील भाविकांची प्रयागराजला जाण्याची सोय झाली. पण, मध्य रेल्वेकडून पश्चिम महाराष्ट्रातून एकही रेल्वे न सोडल्याने तब्बल 144 वर्षानंतर होत असलेल्या कुंभमेळ्यात सहभागी होण्यासाठी उत्सुक भाविकांची यामुळे नाराजी झाली आहे. पश्चिम महाराष्ट्रातून रेल्वे गाडी न सोडल्याने अनेक प्रवाशांना रेल्वे नसल्याने कुंभमेळाव्याला जाता आले नाही. याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
मध्य रेल्वेने महाकुंभसाठी केवळ पुणे, मुंबई व अन्य ठिकाणाहून रेल्वेची व्यवस्था केली. पण, पश्चिम महाराष्ट्रातून भाविकांसाठी एक विशेष गाडी प्रयागराजसाठी सोडली नाही. नेहमीच मध्य रेल्वेकडून पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांकडे दुर्लक्ष केले जाते.- संजय पाटील, अध्यक्ष, प्रवासी सेवा संघ, सोलापूर