सोलापूर : शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर प्रताप नगर तांडा आहे. ही बंजारा समाजाची जिल्ह्यातील मोठी वसाहत आहे. मात्र इतक्या मोठ्या वसाहतीत स्वातंत्र्याच्या 76 वर्षांनंतरही स्मशानभूमी नसल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. स्मशानभूमी नसल्याने शेतातच अंत्यसंस्कार करावे लागतात. येथील सामुदायिक स्मशानभूमीचा प्रश्न अद्यापही सोडवला नाही. यासाठी जिल्हा व पालिका प्रशासनाकडून प्रयत्नांची गरज आहे.
प्रताप नगर तांड्याची वसाहत सध्या महापालिकेच्या क्षेत्रात समाविष्ट झाली आहे. याला साधारणतः वीस वर्षांचा काळ लोटला. सहा हजाराहून अधिक लोकसंख्येचा हा तांडा आहे. महापालिकेत या समाजाचे दोन महापौर व अनेक लोकप्रतिनिधींनी नेतृत्व केले आहे. त्यांच्या कामाच्या ओघात हा प्रश्न तसाच राहिला. त्यांनी हा प्रश्न सभागृहात उचलून धरला असता. स्मशानभूमीचा प्रश्न सहज सुटला असता. एखादा गृहस्थ दगावल्यास त्यांच्या शेतातच त्याच्यावर अंतिमविधी केला जातो. ज्यांच्याकडे शेती नाही, अशांवर मात्र, त्यांच्या पाहुण्याच्या शेतात किंवा ओढ्याच्या बाजूला अंत्यसंस्कार होतात, मात्र तेेथेही काही वेळा विरोध होतो.
जिल्हा व पालिका प्रशासनाकडून संयुक्तपणे प्रयत्न होणे गरजेचे आहे. येथील परिसरात शासनाच्या मालकीच्या असलेल्या जागेत स्मशानभूमी करण्यासाठी विविध लोकप्रतिनिधीसह उच्च पदस्थ अधिकार्यांकडून प्रयत्नांची गरज आहे.
भूमिहीन असलेल्यांवर डोणगाव रस्त्याच्या बाजूला किंवा तेथे विरोध झाल्यास राजस्वनगर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जातात. सेवा फाऊंडेशनच्यावतीने जिल्हाधिकारी व महापालिका प्रशासनाकडे नव्या जागेची मागणी केली आहे. जर स्वतंत्र जागा न दिल्यास जनतेसह रस्त्यावर उतरणार आहे.- प्रकाश राठोड, संस्थापक अध्यक्ष सेवा फाऊंडेशन
स्मशानभूमीसाठी अनेक वेळा प्रयत्न केले. तत्कालीन आमदार दिलीप माने व तद्नंतर आमदार सुभाष देशमुख यांच्या माध्यमातून प्रयत्न केला. बाजारभावाच्या किंमतीनुसार जमिनीची किंमत पालिका प्रशासन देऊ शकत नाही. पण, आमचे प्रयत्न चालू आहेत.- प्रा. भोजराज पवार, माजी नगरसेवक