पंढरपूर : राज्य शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीतील जाचक अटी व नियमामुळे बहुतांश शेतकरी या कर्जमाफीपासून वंचित राहणार आहेत. या अटी-शर्ती रद्द करून विनाअट सरसकट कर्जमाफी मिळावी, या मागण्यांसाठी आ. रोहित पवार यांनी शुक्रवारपासून (दि. १२) येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात अन्नत्याग आंदोलन सुरू केले. याला शेतकऱ्यांचा मोठा पाठिंबा मिळत आहे.
सायंकाळी सहा वाजता अपर पोलिस अधीक्षक प्रीतम यावलकर, सहायक पोलिस अधीक्षक प्रशांत डगळे, प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी आंदोनलकर्ते आ. पवार यांच्याशी चर्चा केली. आ. पवार यांच्या मागण्या मंत्रालयात कळविणार असल्याचे प्रशासकीय सूत्रांनी सांगितले. दरम्यान, या आंदोलनाबाबत काही निरोप आलेला नाही. त्यामुळे आंदोलक काय भूमिका घेणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माढ्याचे खा. धैर्यशील मोहिते-पाटील, आ. राजू खरे, माढ्याचे आ. अभिजित पाटील, माजी पालकमंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी सरकारने शेतकऱ्यांची सरसकट दोन लाख रुपये कर्जमाफी करावी, अशी मागणी केली. यावेळी पक्षाचे शेकडो पदाधिकारी, तसेच स्थानिक विविध पक्ष, संघटनांनी आंदोलनाला जाहीर पाठिबा दिला आहे. आंदोलनाला प्रशासनाकडून परवानगी दिलेली नाही. मात्र, आ. रोहित पवार यांनी हातात संविधान असेल तर प्रशासनाने परवानगी दिली काय अन् नाही दिली काय, फरक पडत नाही असे म्हणत आंदोलन सुरू केले आहे.