सोलापूर : विनातिकीट प्रवास, चुकीच्या तिकीटाचा वापर व रेल्वेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर भूमिका रेल्वेने घेतली आहे. याबाबत १९ जून रोजी अधिसूचना जारी झाली असून २० जूनपासून याची अंमलबजावणी सुरू केली आहे.
नव्या नियमानुसार विनातिकीट प्रवास करताना पकडल्या जाणाऱ्या प्रवाशांना आता किमान दंड हा पाचशे रूपये भरावा लागणार आहे. यापूर्वी दंडाची रक्कम अडीचशे रुपये होती. विनातिकीट प्रवाशांकडून प्रवासाचे पूर्ण भाडे, अतिरिक्त शुल्क व किमान पाचशे रूपये दंड वसूल केला जाईल. दंड भरण्यास नकार दिल्यास संबंधिताविरुद्ध न्यायालयीन कारवाईचीही यात तरतूद केली आहे. शिवाय, गंभीर प्रकरणांत सहा महिन्यांची तुरुंगवासही होणार आहे. तसेच दुसऱ्या व्यक्तीच्या नावावरील तिकीट वापरल्यास ती तिकीट जप्त करून दंडात्मक कारवाई केली जाईल.
गेल्या मे महिन्यात मध्य रेल्वे विभागाकडून ४.९६ लाख विनातिकीट प्रवासी पकडून त्यांच्याकडून ४०. ८५ कोटी दंड वसूल केला. वाढत्या विनातिकीट प्रवासाला आळा घालण्यासाठी व रेल्वे महसूल सुरक्षित ठेवण्यासाठी जन विश्वास (दुरुस्ती) कायदा २०२६ अंतर्गत रेल्वे कायदा १९८९ मधील कलम १३७ व १३८ मध्ये सुधारणा केली आहे.