पंढरपूर : राजकीय पक्ष आणि नेते कोणतेही असोत, परंतु संकटाच्या काळात मराठा समाजाच्या पाठीशी उभे राहणे महत्त्वाचे आहे. जात प्रथम, पक्ष नंतर असा आक्रमक निर्धार व्यक्त करीत मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी २९ ऑगस्ट रोजी अंतरवाली सराटी येथे होणाऱ्या आंदोलनासाठी महाराष्ट्रातील मराठा समाजाने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले.
पंढरपूर तालुक्यातील सरकोली येथील सभेत जरांगे यांनी मराठा-कुणबी नोंदींच्या आधारे मिळालेल्या प्रमाणपत्रांबाबत होत असलेल्या कथित कारवाईवर प्रश्न उपस्थित केला. काही नोंदी व प्रमाणपत्रांच्या वैधतेबाबत परस्परविरोधी निर्णय होत असल्याचा दावा करत, मराठा समाजाच्या लेकरांच्या भवितव्याशी खेळण्याचा अधिकार कोणालाही नाही, असे सुनावले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि मंत्री संजय शिरसाट यांच्या भूमिकेवरही जरांगे यांनी टीका करत संबंधित निर्णयांबाबत सरकारने स्पष्ट भूमिका जाहीर करावी, अशी मागणी केली. मराठा समाजाने शिक्षण, रोजगार, आर्थिक स्वावलंबनासाठी संघटित होण्याची गरज व्यक्त केली.
जुन्या नोंदींच्या आधारे निर्णय लागू करा
५८ लाख कुणबी नोंदींच्या आधारे पात्र मराठा समाजाला प्रमाणपत्रे मिळाली पाहिजेत. सातारा, कोल्हापूर, पुणे आणि औंध संस्थानांच्या जुन्या नोंदींच्या आधारे आवश्यक शासन निर्णय लागू करा, मराठा विद्यार्थ्यांना शिक्षण, रोजगार, सारथी आणि अन्य योजनांचा लाभ मिळावा, प्रलंबित मागण्या मार्गी लागाव्यात अशा मागण्या त्यांनी केल्या.