राज्यात एक लाख आठ हजार 82 शाळा आहेत. त्यातील 50 हजार शाळा सीसीटीव्हीविना आहेत. कॅमेरे नसल्याने विद्यार्थ्यांची सुरक्षा वार्यावर आहे. त्यामुळे त्या शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी पालकांतून होत आहे.
राज्यातील अनेक शाळेत विद्यार्थिनींच्या लैंगिक शोषणाचे प्रकार घडले आहेत. ते रोखणे, सुरक्षेसाठी शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. राज्यातील एक लाख आठ हजार 82 शाळांपैकी केवळ 58 हजार शाळांमध्येच सीसीटीव्ही कॅमेरे लागले आहेत. त्यामुळे शाळा आणि परिसरातील बालकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. बदलापूरमध्ये दोन लहान मुलींवरील अत्याचाराप्रकरणी पालक आणि रहिवाशांच्या उद्रेकानंतर खासगी शाळांमध्येही एक महिन्याच्या आत सीसीटीव्ही लावण्याचे आदेश दिले. मात्र, त्या आदेशांकडे शाळांनी दुर्लक्ष केल्याचे चित्र राज्यभर दिसत आहे.
बदलापूरमधील अत्याचार घटनेनंतर राज्य शासन खडबडून जागे झाले. ऑगस्ट महिन्यात सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर राज्यातील सर्व शाळेत सीसीटीव्ही न लावणार्या शाळांची मान्यता रद्द करण्याचे आदेश राज्य सरकारने 26 सप्टेंबर 2024 रोजी दिले होते. आदेश देऊन सहा महिने पूर्ण झाले आहेत. मात्र अद्यापही हजारो शाळा सीसीटीव्हीविना आहेत.
सोलापूर जिल्हा परिषदेच्या जिल्ह्यात दोन हजार 777 शाळा आहेत. त्यातील 502 शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. तर जवळपास सर्वच खासगी शाळेत कॅमेरे आहेत. शासनाकडून जसा निधी येत आहे तसे जिल्हा परिषदेच्या शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येत आहेत.कादर शेख, शिक्षणाधिकारी, प्राथमिक, जि.प. सोलापूर
सीसीटीव्ही कॅमेरे न बसणार्या शाळांची मान्यता रद्द करण्याचे आदेश सहा महिन्यांपूर्वी शासनाने काढले होते. त्यामुळे राज्यातील सर्व शाळांनी सीसीटिव्ही कॅमेरे बसविणे गरजेचे होते. मात्र, अद्यापही 50 हजार शाळांनी कॅमेरे बसविले नाहीथ. त्यामुळे त्या शाळांनी तत्काळ कॅमेरे बसवावेत.प्रशांत शिरगुर, राज्य उपाध्यक्ष, पवित्र पोर्टल शिक्षक भरती संघटना