सोलापूर : कुस्तीच्या मैदानात प्रतिस्पर्ध्याला चितपट करणाऱ्या महिला मल्लांच्या यशामागे पहाटेपासून सुरू होणारी कठोर मेहनत आणि शिस्तबद्ध जीवनशैली कारणीभूत असते.
गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांत मुलींसाठी अत्याधुनिक कुस्ती प्रशिक्षण केंद्रे उपलब्ध झाल्याने आता मोठ्या संख्येने मुली या क्षेत्राकडे वळत आहेत. या महिला कुस्तीगिरांचा दिवस पहाटे 5 वाजता सुरू होतो. शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी त्या दोरीवरच्या उड्या, शेकडो जोर-बैठका आणि तासन्तास कुस्तीच्या डाव-पेचांचा कसून सराव करतात.
मातीतील पारंपरिक कुस्ती आणि मॅटवरील आधुनिक तंत्र अशा दोन्ही आघाड्यांवर त्या स्वतःला सिद्ध करतात. चपळता आणि ताकदीसाठी नारंगी आणि हनुमान या देशी व्यायामांवर त्यांचा विशेष भर असतो. केवळ व्यायामच नाही, तर त्यांचा आहारही तितकाच काटेकोर असतो. आहारात दूध, तूप, बदाम आणि कडधान्यांचा समावेश करून त्या नैसर्गिकरीत्या प्रथिने मिळवतात. तेलकट पदार्थ टाळून घरगुती सकस अन्नाच्या जोरावरच त्या मैदानात ताकद दाखवतात. ही शारीरिक आणि मानसिक शिस्तच त्यांना यशाच्या शिखरापर्यंत पोहोचवते.
हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा उत्साह शिगेला पोहोचला होता. स्पर्धेसाठी मैदानावर जर्मन हँगर उभारण्यात आले असून, शनिवारी पहाटे सात वाजल्यापासूनच राज्यभरातून आलेले मल्ल आणि त्यांचे मार्गदर्शक उपस्थित झाले होते.
दूरवरून आलेल्या या खेळाडूंची आणि प्रशिक्षकांची गैरसोय होऊ नये, यासाठी संयोजकांतर्फे चोख व्यवस्था करण्यात आली होती. कुस्तीगिरांच्या आहाराची गरज ओळखून सकाळी सात वाजल्यापासूनच त्यांच्यासाठी खास नाश्त्याची सोय करण्यात आली होती. यामध्ये गरम उपमा, दूध, केळी आणि चहा यांचा समावेश होता. हे सर्व पदार्थ अनलिमिटेड स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आल्याने खेळाडूंनी समाधान व्यक्त केले. मैदानातील सरावानंतर आणि वजन प्रक्रियेदरम्यान खेळाडूंना ऊर्जा मिळावी, या उद्देशाने हा सकस अल्पोपहार देण्यात आला. सोलापूरच्या या ऐतिहासिक कुस्ती सोहळ्याची राज्यभरातून आलेल्या मल्लांमध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे.