सोलापूर : राज्यातील ग्रंथालय कर्मचारी तुटपुंज्या वेतनावर काम करत आहेत. तुटपुंज्या वेतनावर कुटूंब संभाळणे अवघड होत असल्याने राज्यातील ग्रंथालय कर्मचारी आत्महत्या करत आहेत. मात्र, याकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रंथालय कर्मचार्यांकडून होत आहे.
राज्यातील 11 हजार 150 सार्वजनिक ग्रंथालयात 20 हजार 321 कर्मचारी तुटपुंज्या वेतनावर काम करत आहेत. दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आहे. अशा परिस्थितीत कुटुंबाची उपजीविका भागविण्यासाठी कर्मचारी यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. राज्यातील अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील नेरपिंगाळाई येथील जयप्रकाश अग्रवाल सार्वजनिक वाचनालयात लिपिक पदावर कार्यरत असलेल्या कर्मचार्यांनी आर्थिक परिस्थितीला कंटाळून वाचनालयाच्या बाथरूममध्ये आत्महत्या केली आहे.
राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी गाव तेथे ग्रंथालय चळवळ सुरु केली होती. ती चळवळ जोपासण्याचे काम मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी केले. विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उच्च व तंत्रशिक्षण चंद्रकांत पाटील यांनी तातडीने 40 टक्के अनुदान वाढीचा निर्णय घ्यावा, अशी मागणी ग्रंथालय कर्मचार्यांतून होत आहे.
ग्रंथालयांची संख्या
कंसात कर्मचारी
अ वर्ग - 329 (1384)
ब वर्ग - 2072 (6216)
क वर्ग - 3972 (7944)
ड वर्ग - 4777 (4777)
एकूण - 11150 (20321)
दिवंगत मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी 1998 व 2000 मध्ये दोन वेळेस ग्रंथालय अनुदान दुप्पट केले होते. मात्र, मागील काही वर्षांपासून ग्रंथालयांच्या अनुदानात वाढ केली नाही. त्यामुळे ग्रंथपाल कर्मचारी आत्महत्या करत आहेत. आत्महत्या रोखण्यासाठी सरकारने 40 टक्के अनुदान तातडीने द्यावे. अन्यथा येत्या काही दिवसात आत्मदहन करणार आहे.- सदाशिव बेडगे, अध्यक्ष, महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी विकास परिषद