सोलापूर : जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांनी मोठ्या प्रमाणात अर्ज भरले आहेत. त्याचा फटका प्रमुख पक्षाच्या उमेदवारांना बसू नये, यासाठी नेत्यांकडून लक्ष्मीदर्शन, विविध विकासकामे देण्याचे आश्वासन देण्यात येत आहे. तरीही अनेक उमेदवार उमेदवारी काढून घेत नसल्याने नेते, प्रमुख पक्षांच्या उमेदवारांची धावपळ उडत असल्याचे चित्र सध्या जिल्ह्यात दिसत आहे.
जिल्हा परिषद, पंचायत समिती
निवडणुकीच्या रणधुमाळीत उमेदवारी अर्ज मंगळवार (दि.27) पर्यंत घेता येणार आहे. रविवारी (दि. 25) आणि सोमवार (दि. 26) रोजी उमेदवार अर्ज मागे घेण्यास सुट्टी आहे. त्यामुळे मंगळवारी अर्ज मागे घेण्यासाठी शेवटचा दिवस राहणार आहे. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेससह इतर पक्षातील उमेदवार इतर उमेदवार अर्ज परत घेण्यासाठी प्रमुख नेते आणि पक्ष पदाधिकाऱ्यांकडून विविध प्रकारची आमिषे दाखवली जात असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहेत. दरम्यान, अधिकृत उमेदवारांमुळे मतांचे विभाजन होऊ नये, तसेच पक्षाची ताकद अबाधित राहावी. यासाठी नेते मंडळी सक्रिय झाली आहेत. बंडखोर उमेदवारांना भविष्यातील राजकीय संधी, पक्षातील पदे, स्थानिक स्वराज्य संस्थांतील जबाबदाऱ्या, विकासनिधीचे आश्वासन तसेच आगामी निवडणुकांतील उमेदवारी यासारखी प्रलोभने दिली जात असल्याची चर्चा आहे.
काही मतदारसंघात दबावतंत्राचा वापर
जिल्ह्यातील काही तालुक्यातील वरिष्ठ नेत्यांकडून थेट भेटीगाठी घेऊन उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तर काही मतदारसंघांत दबावाचे राजकारणही होत असल्याची कुजबुज आहे. मात्र, काही बंडखोर उमेदवारांनी न झुकण्याची भूमिका घेतल्याने पक्ष नेतृत्वाची डोकेदुखी वाढली आहे.
रविवार व सोमवार मनधरणीचा दिवस
अर्ज माघारीची अंतिम तारीख ही मंगळवारी असून, रविवार आणि सोमवारी उमेदवारांची मनधरणी मोठ्या प्रमाणात होणार आहे. तब्बल नऊ वर्षानंतर जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका होत असल्यामुळे बरेचजण उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी नकार देत आहेत. त्यामुळे कोण माघार घेणार आणि कोण मैदानात ठाम राहणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.