सोलापूर : सोलापूर बाजार समितीची निवडणूक दोन्ही पॅनेलकडून प्रतिष्ठेची केली जात आहे. आ. सचिन कल्याणशेट्टी हे सर्वपक्षीय महाआघाडीकडून विजयाच्या दृष्टीने विविध प्रमुखांशी संवाद साधत विजय आपलाच व्हावा या हेतूने सांगड घालत आहे. तर भाजपच्या पॅनेलकडून आ. सुभाष देशमुख मतभेद बाजूला सारून विविध प्रमुखांचे घर गाठत हितगुज करत आहे. दुसरीकडे प्रत्येक उमेदवार मात्र मतदारांचे दार ठोठावताना दिसत आहेत.
महाआघाडीचे कर्णधार म्हणून आ. कल्याणशेट्टी यांनी विविध स्तरावरील नेत्यांशी संवाद साधत विजयाचे गणित मांडत आहेत. त्यांनी अक्कलकोट तालुक्यातील दोन्ही बाजार समिती ज्या पद्धतीने ताब्यात घेतल्या त्याचपद्धतीने सोलापूर बाजार समिती जिंकण्यासाठी त्यांनी तयारी सुरू केली आहे. तर दुसरीकडे आ. देशमुख यांनीही विधानसभेला ज्या पद्धतीने दणदणीत विजय मिळवला तसा विजय पुन्हा साकार करण्यासाठी मतभेद विसरत आ. विजयकुमार देशमुख, बळीराम साठे, माजी आ. सिद्धाराम म्हेत्रे, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके, महादेव चाकोते, जाफरताज पाटील, माजी सभापती मल्लिकार्जुन पाटील यांची भेट घेऊन विजयासाठी जुळवाजुळव करत आहेत.
सोसायटी आणि ग्रामपंचायत गटातून निवडणूक लढवत असलेले दोन्ही बाजूचे उमेदवार प्रचारात गुंतले आहेत. प्रत्येक मतदारांच्या दारापर्यंत उमेदवरांच्या अलिशान गाड्या जात आहेत. दोन्ही बाजूकडून लढत असलेले वजनदार उमेदवार हे सकाळीच घर सोडत आहेत. कारण, मतदारांना शेतातील वस्तीवर गाठून आपला व पॅनेलचा प्रचार करत आहेत. बाजार समितीच्या निवडणुकीत हळूहळू रंग येत आहे. या निवडणुकीशी शहर आणि जिल्ह्यातील अनेक नेते जुळवून घेत आहेत. दोन्ही आघाडीच्या नेत्यांकडून बैठकीचे सत्र अद्याप सुरूच आहेत. तर उमेदवार मात्र आपआपल्या परीने प्रचारात उतरत मतांची बेरीज करीत आहेत.
काही राजकीय पक्षांच्या नेत्यांकडे सोसायटी किंवा ग्रामपंचायत प्रवर्गातील एकही मतदार नाही, तरीही ते पहिल्या रांगेत प्रमुखांच्या बाजूला बसताना दिसत आहेत. यावरुन या निवडणुकीत त्यांचा वट्ट वाढल्याचे जाणवते.