सोलापूर ः शक्तीपीठ महामार्गाचा मार्ग बदलताना अनेक अधिकाऱ्यांनी विरोध केला होता. जुन्या मार्गावर त्यांनी जमिनी घेऊन ठेवल्या असण्याचा शक्यता होती त्यामुळे हा विरोध होता का अशी शंका पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केली. भोंदू अशोक खरात याने उत्तर तालुक्यात घेतलेल्या जमिनीबाबत बोलताना त्यांनी हा गौप्यस्फोट केला.
नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्ग उत्तर सोलापूर तालुक्यातील कळमण येथून जाणार होता. या गावाच्या परिसरात अशोक खरात, माजी आ. दीपक साळुंखे पाटील, ओसवाल यांच्यासह अनेक बड्या नेते, उद्योगपतींनी जमिनी खरेदी करुन ठेव्ाल्या. त्यांना येथून शक्तीपीठ महामार्ग जाणार असल्याची अगोदरपासून माहिती होती का, असेल तर ती कोणी दिली, एकूणच या संपूर्ण प्रकरणाची चौकशी होणार आहे. खरात सारखे लोक झटपट पैसा कमाविण्यासाठी असा प्रकार करतात. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे चौकशी करत असल्याचे पालकमंत्री गोरे यांनी सांगितले.
सोलापूर जिल्हा नियोजन समितीच्या निधीबाबत त्यांनी खा. प्रणिती शिंदे यांचे कान टोचले. त्या माझ्या भगिनी असून डीपीसी निधी हा वैयक्तिक नावावर येत नसतो. विविध खात्यांना तो निधी दिला जातो. त्या निधीच्या मागणीचे पत्र वेळेत देणे गरजेचे असते. दरम्यान, पालकमंत्री गोरे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन केले. यावेळी आ. सचिन कल्याणशेट्टी, आ. देवेंद्र कोठे, महापौर विनायक कोंड्याल, भाजपाच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर, जिल्हाध्यक्ष शशीकांत चव्हाण, भाजप नेते शहाजी पवार यांची उपस्थिती होती.