मोहोळ : मराठवाड्यातील मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटनुसार आरक्षण देण्याचा निर्णय होण्याची प्रक्रिया शासन पातळीवर सुरू आहे. मात्र, तसा निर्णय झाल्यास मूळ मराठवाड्यातील व शासनाने प्रशासकीय सोयीसाठी सोलापूर जिल्ह्यात समाविष्ठीत केलेल्या ' त्या ५८ गावांतील ' मराठा समाजावर अन्याय होणार आहे. पूर्वी ही गावे मराठवाड्यातच होती. मात्र, ही गावे 'मराठवाडा मुक्तिदिना' पासून आजही वंचित आहेत.
मराठवाड्यातील मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी स्थापन झालेल्या न्यायमूर्ती शिंदे समितीचे कार्यक्षेत्र हे सध्याच्या मराठवाड्यापुरते मर्यादित आहे. मात्र, यामुळे हैदराबाद मुक्तिसंग्रामानंतर मूळ मराठवाड्यातून प्रशासकीय सोयीसाठी सोलापूर जिल्ह्यात समाविष्ट करण्यात आलेला 'त्या ५८ गावांतील ' मराठा समाज आरक्षणाच्या लाभापासून वंचित राहणार आहे. याबाबत मागील एक वर्षापासून न्या. शिंदे समिती सह जिल्हा प्रशासनाला अनेक वेळा निवेदने देण्यात येऊनही या गावांचा विचार प्रशासनाने केलेला नाही. मागील ७४ वर्षांत या परिसरातील ५८ गावांना मुक्तिसंग्रमाचा विसर पडलेला आहे.
मराठवाडा मुक्तीसाठी स्थापन झालेल्या मुक्तापूर स्वराज्याची राजधानी असलेल्या जामगाव (ता.माढा) येथील जामगावकर पाटील कुटुंबीयांकडून मात्र मागील १५ वर्षापासून जामगाव (ता.माढा) येथे मुक्तिदिन साजरा करण्यात येतो. मात्र, केवळ जामगाव (ता. माढा) वगळता सोलापूर जिल्ह्यातील इतर ५७ गावांमध्ये मुक्तिदिन साजरा होऊ शकला नाही.
उत्तर सोलापूर तालुक्यातील - भागाईवाडी, कौठाळी, साखरेवाडी, कळमण, पडसाळी, वांगी, इंचगाव, रानमसले, बीबीदारफळ, शिवणी, नान्नज, मोहितेवाडी व गरलाचीवाडी (गरलाचीवडीया या गावाचा उलगडा अद्याप झालेला नाही.).
बार्शी तालुक्यातील : शेलगाव, श्रीपतपिंपरी, मानेगाव (थो), भोंजे, शेंद्री, वांगरवाडी, इलें, रऊळगाव, मुंगशी (वा.), सासुरे, तावरवाडी, बोरगाव.
माढा तालुक्यातील : अंजनगाव (3),जामगाव, केवड, चव्हाणवाडी, हटकरवाडी, कापसेवाडी, धानोरे, बुद्रुकवाडी, पाचफुलेवाडी, खैराव, रिधोरे, उपळाई, सुलतानपूर.
मोहोळ तालुक्यातील : आष्टे, पोफळी, विरवडे (खु), चिखली, यल्लमवाडी, पवारवाडी, बोपले, एकुरके, मनगोळी, भैरववाडी, वाळूज (दे), देगाव (वा), घोरपडी, डिकसळ, खुनेश्वर, भोयरे व मसलेचौधरी.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील: वरळेगाव
"ज्या गावांनी हैद्राबाद मुक्ती संग्राम साजरा केला. त्यांना सुविधा देण्यात याव्यात. तसेच ज्याप्रमाणे स्वातंत्र्यदिन संपूर्ण देशात राजरा केला जातो. त्याच प्रमाणे 'मराठवाडा मुक्तीदिन सोहळा' हा फक्त मराठवाडा आणि सोलापूर जिल्ह्यातच नव्हे, तर संपूर्ण देशात साजरा होणे आवश्यक आहे. सध्या शासनाकडून मराठवाड्याच्या आठ जिल्ह्यांतच 'मुक्तिदिन' साजरा केला जातो. किमान सोलापूर जिल्ह्यातील तत्कालीन ५८ गावांत तरी मराठवाडा मुक्तिदिनानिमित्त शासकीय पातळीवर ध्वजवंदन करण्यात यावे."- सतीश कदम, इतिहास अभ्यासक
"न्यायमूर्ती शिंदे समितीसह सोलापूर जिल्हा प्रशासनाला ५८ गावांचे दप्तर शोधून कुणबी नोंदीचा शोध घ्यावा, असे वारंवार निवेदन दिलेले आहे. मात्र, अद्यापपर्यंत जिल्हा प्रशासनाला ५८ गावांचे दप्तर मिळालेले नाही. यामुळे या गावातील अनेकांवर अन्याय झालेला आहे. प्रशासनाने यासाठी योग्य पावले उचलावीत.- पंडित ढवण, समन्वयक, सकल मराठा समाज, मोहोळ
हैदराबाद गॅझेट नुसार १९५० पूर्वीचे मोहोळ तालुक्यातील १७ गावांचे कोणतेही रेकॉर्ड आमच्याकडे उपलब्ध नाही, असे तुळजापूर, सोलापूर व मोहोळ या तिन्ही ठिकाणी सांगण्यात येते. वास्तविक पाहता हैदराबाद गॅझेटनुसार हैदराबाद संस्थांमध्ये असलेल्या गावांमधील 38 टक्के लोकसंख्या ही त्या काळच्या जनगणनेनुसार कुणबी होती. ज्यांचे रेकॉर्ड शासन दरबारी उपलब्ध नाही, अशा मराठा लोकांनी आपल्या नोंदी शोधायच्या कुठे ? त्याकरता हैदराबाद गॅझेट लागू करावी, अशी आमची मागणी मनोज जरांगे - पाटील यांच्या नेतृत्वाखाली आहे.- शुभांगी लंबे, मराठा समाज महिला समन्वयक, मोहोळ