सोलापूर : जगात लहान मुलांचा लठ्ठपणा हा सध्या चिंतेचा विषय बनला आहे. आजच्या घडीला भारतासारख्या देशातही एक कोटी 25 लाख मुले लठ्ठ आहेत. येत्या 2030 पर्यंत यात झपाट्याने वाढून ती दोन कोटी 70 लाख होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सध्या लहान मुलांमधील वाढता लठ्ठपणा ही एक गंभीर समस्या बनत असून, यामुळे भविष्यात मोठ्या प्रमाणावर लहान मुलांच्या लठ्ठपणाचे मोठे संकट उभे राहू शकेल, असे नुकतेच युनिसेफच्या अहवालांतून स्पष्ट झालेले आहे. मुलांची बदललेली जीवनशैलीच या लठ्ठपणाचे कारण ठरत असून, मुलांचा स्क्रीनटाईम अधिक वाढला आहे. मोबाईल, टीव्ही व व्हिडीओ गेम्समुळे शारीरिक हालचाल थांबली आहे. साखरयुक्त थंड पेयांचे सेवन सध्या मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहे. पिझ्झा, बर्गर, चिप्स व शीतपेयामुळे शरीरातील कॅलरीजचे प्रमाण वाढते. पाकीट बंद फूडमधील ट्रान्स फॅट व प्रिझर्व्हेटिव्हज चयापचय क्रियेवर परिणाम करतात. हेसुद्धा लठ्ठपणाला कारणीभूत आहे.
लठ्ठपणाचा परिणाम हा फक्त शरीराच्या वजनावरच होत नसून तो अनेक गंभीर आजारांना आमंत्रण देतो. बालपणातील वाढलेले वजन मधुमेह, हृदयरोग, उच्च रक्तदाब यांसारख्या आजारांचे केंद्रही ठरू शकते. मानसिक आरोग्यावरही मोठा परिणाम होतो. लठ्ठ मुलांचा आत्मविश्वास कमी होतो. शिवाय, चिडचिड, सामाजिक एकटेपणा यांसारख्या समस्याही उद्भवतात.
अतिआहार, जेवणात चुकीच्या आहाराचा समावेश करणे यामुळे मुले लठ्ठ होतात. मुले लठ्ठ होण्याची समस्या ही फक्त विकसित देशांपुरती मर्यादित नसून ती देशासह अन्य विकसनशील देशांतही झपाट्याने वाढत आहे.