पंढरपूर : तालुक्यात म्हणावा तसा पाऊस झाला नसल्याने खरिपाच्या पेरण्या झालेल्या नाहीत. त्यामुळे दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झालेली आहे. असे असतानाच उजनी व वीर धरणातून भीमा नदीला सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे पूर आला आहे. परंतु शेतकरी पावसाची आतूरतेने वाट पाहत असतानाच दोन महिन्यानंतर सोमवारी दुपारी पंढरपूर शहर व तालुक्यात दमदार पाऊस झाल्याने शेती पिकांना दिलासा मिळाला आहे.
जूनच्या सुरुवातीपासूनच पंढरपूर तालुक्याकडे पावसाने पाठ फिरवली आहे. अधूनमधून हलक्या स्वरुपाचा पाऊस पडत होता. त्यामुळे शेती पिकांना फायदा होण्यापेक्षा रोगराईच वाढली जात होती. त्यामुळे शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत होता. तब्बल दोन महिन्यानंतर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यातच पावसाने दमदार हजेरी लावली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या असून खरीप हंगामाच्या पेरण्या करण्यास अनुकूल पाऊस असल्याची चर्चा शेतकऱ्यांमधून रंगत आहे. नीरा उजवा कालव्यातून शेतीसाठी पाणी सोडण्यात आलेले आहे. परंतु हे पाणी मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना कसरत करावी लागत आहे. पाण्याची वाट पाहून अनेक पिके हातातून जाऊ लागली आहेत. अशातच सोमवारी दमदार पाऊस झाल्याने शेती पिकांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, पंढरपूर शहरात आषाढी यात्रेनिमित्त तयार झालेली घाण, दुर्गंधी या पावसामुळे वाहून गेली असून रस्ते, मोकळ्या जागा, उपनगरीय भाग स्वच्छ झाला आहे.