सोलापूर : घरात लग्नाची धांदल सुरू असताना नवरदेवाचाच खून झाल्याची घटना नई जिंदगीतील शांतीनगरात घडली. उमर मौलाली बिराजदार (वय २२) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (दि. ६) उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी सायंकाळच्या सुमारास तिघा संशयितांना ताब्यात घेतले. त्यांची नावे कळू शकली नाहीत.
उमरचा साखरपुडा झाला असून, घरात लग्नाची लगबग सुरू होती. परंतु, अचानक त्याच्या खुनामुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. कोयत्याने वार करून टाकलेला उमरचा मृतदेह शांतीनगर पाण्याच्या टाकीखाली आढळून आला. त्याच्या बाजूला मोटारसायकल होती. उमरच्या शरीरावर सात ते आठ गंभीर वार करण्यात आले असून, रक्ताने माखलेला कोयता घटनास्थळावरून जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.