मुंबई : राज्यातील सात जिल्ह्यांत सरकारी रुग्णालयात एमआरआय सेवा सुरू करण्यात येत असून कोल्हापूर, सातारा, सोलापूरसह 11 जिल्ह्यांमध्ये डायलिसिस सेवांचा विस्तार करण्यात येत आहे. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते महाराष्ट्रदिनी या सेवांचे लोकार्पण करण्यात येणार आहे. या सेवांमुळे ग्रामीण व दुर्गम भागातील रुग्णांना अत्याधुनिक उपचार सुविधा उपलब्ध होणार आहे.
प्रधानमंत्री राष्ट्रीय डायलिसिस कार्यक्रमाअंतर्गत डायलिसिस सेवा पुरविण्यात येत आहे. यामध्ये कोल्हापूर, यवतमाळ, बीड, नाशिक, जळगाव, सोलापूर, सातारा, सिंधुदुर्ग, ठाणे, गडचिरोली आणि रत्नागिरी या 11 जिल्ह्यांतील ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयांमध्ये डायलिसिस सेवा सुरू करण्यात येत आहे. यामुळे किडनी रुग्णांना नियमित व मोफत उपचार मिळणार असून प्रवासाचा त्रासही कमी होणार आहे. तसेच राज्यातील 92 आरोग्य संस्थांमध्ये सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर डायलिसिस सेवा यापूर्वीच सुरू करण्यात आली असून ही सेवा पूर्णपणे नि:शुल्क आहे.
याबरोबरच भंडारा, बुलडाणा, अमरावती, नांदेड, धाराशिव, हिंगोली आणि परभणी या सात जिल्ह्यांतील शासकीय रुग्णालयांमध्ये 24 तास मोफत एमआरआय सेवा उपलब्ध राहणार आहे. यासाठी आवश्यक टेक्निशियन व रेडिओलॉजिस्ट हे सेवा पुरवठादारामार्फत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
डायलिसीस केंद्रे : सोलापूर (मंगळवेढा), कोल्हापूर (मुरगूड), यवतमाळ (दारव्हा), बीड (केज), नाशिक (इगतपुरी), जळगाव (रावेर), सातारा (ढेबेवाडी), सिंधुदुर्ग (वेंगुर्ला), ठाणे (बदलापूर), गडचिरोली (कुरखेडा), रत्नागिरी (दापोली).