सोलापूर ः पुढारी वृत्तसेवा
गौरी-गणपती सणानिमित्त 100 रुपयांत रेशन दुकानातील लाभार्थ्यांना आनंदाचा शिधा वाटप करण्याचे आदेश सरकारने दिले होते. मात्र गौरी-गणपतीच्या काळात शिधा वेळेत आलाच नाही. गणपती विसर्जन झाले. मात्र अद्याप पाच तालुक्यांना शिधा मिळाला नाही. आतापर्यंत उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, माळशिरस, अक्कलकोट, पंढरपूर, करमाळा तालुक्यात त्याचे वाटप झाले. भाजप आमदारांच्या तालुक्यांनाच शिध्याचे वाटप झाल्याची चर्चा राजकीय पटलावर सुरु आहे.
गोरगरिबांना सण आनंदाने साजरा करता यावा म्हणून महायुतीच्या सरकारने आनंदाचा शिधा वाटप करण्यास सुरुवात केली. 100 रुपयांत चनाडाळ, रवा, खाद्यतेल, साखर, रवा या पाच वस्तू दिल्या जातात. गौरी-गणपतीच्या काळात शिधा वाटप करणे अपेक्षित होते. मात्र, तसे झाले नाही. जिल्ह्यासाठी तीन लाख 51 हजार संच मिळणे अपेक्षित होते. पण, दोन लाख संच अद्याप उपलब्ध झाले नाहीत. आतापर्यंत एक लाख 17 हजार 85 जिन्नस वाटप झाले आहे. सोलापूर शहरातही पूर्ण किट न वाटता तेल, रवा, साखर वाटप होत आहे.
एकुण रेशन कार्डधारक लाभार्थी ः चार लाख 65 हजार
ग्रामीण भागातील लाभार्थी ः तीन लाख 51 हजार 86
सोलापुरातील लाभार्थी ः एक लाख 24 हजार
आतापर्यंत वाटप ः एक लाख 17 हजार 85 हजार
शिधा न मिळालेले तालुके ः मोहोळ, माढा, बार्शी, मंगळवेढा, सांगोला.
गौरी-गणपतीसाठीचा शिधा वेळेत आला नसल्यामुळे वाटपासाठी उशिर झाला आहे. आतापर्यंत सहा तालुक्यात वाटप झाले आहे. उर्वरित पाच तालुक्यात लवकरच वाटप होईल. शिधा पूर्ण आल्यानंतर थोड्याच दिवसात वाटप होईल.- संतोष सरडे, जिल्हापुरवठा अधिकारी