सोलापूर : सिद्धेश्वर तलावात पुन्हा एकदा माशांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तलावाच्या पाण्यात वाढते प्रदूषण, सांडपाण्याचा मिसळणारा प्रवाह आणि ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे हजारो माशांचा मृत्यू झाला आहे. माशांचा मृत्यू होण्याची ही तिसरी घटना आहे.
सिद्धेश्वर तलावाच्या काठावर रविवारी (दि. 24) रोजी मोठ्या प्रमाणात मासे आले होते. त्यातील काही मासे मृत झाले होते, तर काही ऑक्सिजनअभावी तडफडत होते. मरणाऱ्या माशांचे प्रमाण जास्त असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. तलावातील दूषित पाण्यामुळे जलचरांचे अस्तित्व धोक्यात आले असून, पर्यावरणीय संतुलन बिघडत असल्याची चिंता व्यक्त होत आहे.
शहरातील सांडपाणी आणि कचरा थेट तलावात जात असल्याने पाणी दूषित होत असल्याचा दावा पर्यावरण प्रेमींतून व्यक्त केला जात आहे. मात्र, याकडे महापालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असून, नियमित स्वच्छता, जलशुद्धीकरण किंवा प्रदूषण नियंत्रणासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.