सोलापूर : जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभाग, ग्रामपंचायत, आरोग्य, कृषी, महिला व बालकल्याण, शिक्षण विभाग, अर्थ विभागासह इतर विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या पुढील महिन्यांत होणार आहेत. मात्र, अर्थ विभागामध्ये बरीच वर्षे कर्मचारी ठाण मांडून आहेत. त्यामुळे या बदल्यांमुळे अर्थ विभागातील कर्मचाऱ्यांची मक्तेदारी संपणार असल्याची चर्चा कर्मचाऱ्यांमध्ये होत आहे.
जिल्हा परिषदेच्या मुख्यालयातील कर्मचाऱ्यांच्या पाच व सहा मे तर पंचायत समिती येथील कर्मचाऱ्यांच्या 18 मेला विनंती आणि प्रशासकीय बदल्या करण्यात येणार असल्याचे पत्र जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी काढले आहे. या निर्णयामुळे मुख्यालयात ठाण मांडून बसलेल्या अनेक अधिकारी, कर्मचाऱ्यांची उचलबांगडी होणार आहे. त्यामुळे सीईओ यांनी घेतलेल्या धाडसी निर्णयाचे कौतुक होत आहे.
दरम्यान, जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात अर्थ, बांधकाम आणि शिक्षण विभागात बदली होण्यासाठी अनेक कर्मचारी पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांकडे लॉबिंग करत आहेत. मात्र, अगोदरच या विभागात अनेक कर्मचारी वर्षानुवर्ष ठाण मांडून आहेत. त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांची मुख्यालयाच्या बाहेर बदली करावी, अशी मागणी जिल्हा परिषदेतील विविध कर्मचारी संघटनेकडून होत आहे.