पंढरपूर : मराठवाड्यात लातूर जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि महापुरामुळे नुकसान झालेल्या शेतकर्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने खते आणि बी-बियाण्यांचे वाटप मनसे नेते माजी गृहराज्यमंत्री बाळा नांदगावकर, पाणी दूत प्रदेश सरचिटणीस डॉ. मनोज चव्हाण, मनसेने ते दिलीप बापू धोत्रे, शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष संतोष नागरगोजे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बोलताना नांदगावकर म्हणाले की, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी आणि महापुरामुळे शेतकर्यांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक शेतकर्यांची हाता तोंडाशी आलेली उभी पिके वाहून गेलेली असून शेतकरी उद्ध्वस्त झालेले आहेत. अनेक लोकांचे संसार उघडड्यावर पडलेले आहेत. तर अनेक शेतकर्यांची जनावरे मृत्युमुखी पडलेले आहेत. अनेक नागरिकांचा यामध्ये मृत्यू झालेला आहे. त्यामुळे सरकारने एनडीआरएफ किंवा इतर कोणत्याही अटी न लावता शेतकर्यांचे सरसकट पंचनामे करून सणासुदीच्या तोंडावर शेतकर्यांच्या खात्यामध्ये त्वरित पैसे जमा करणे गरजेचे आहे.
वास्तविक पाहता 2022 ला महाराष्ट्र सरकारने हेक्टरी 13500 रुपयांची मदत जाहीर केली होती आणि मग आता 8500 रुपये कोणत्या हिशेबाने दिले, याचा प्रश्न पडलेला आहे. वास्तविक 13500 असतील किंवा 8500 असतील ही तुटपुंजी मदत आहे. शेतकर्याला एका हेक्टरमध्ये पाळी, पेरणी, नांगरणी फवारणी जर करायचं म्हणलं तर किमान एक लाख रुपये खर्च येतो. बागायतीचा खर्च यापेक्षा दुप्पट असतो तरी देखील सरकार शेतकर्यांकडे दुर्लक्ष करत आहे. मुख्यमंत्र्यांनी आणि पंतप्रधानांनी यामध्ये लक्ष घालून शेतकर्यांचे सरसकट कर्जमाफी केली पाहिजे. अशी मागणी बाळा नांदगावकर यांनी केली आहे. यावेळी लातूर जिल्हाध्यक्ष शिवकुमार नागराळे, जिल्हाध्यक्ष डॉ. नरसिह भिकाने यांच्यासह जिल्ह्यातून शेतकरी आणि मनसेचे सर्व पदाधिकारी महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.