पंढरपूर : राज्याच्या तिजोरीवर पहिला अधिकार कोणाचा असेल तर बळीराजाचा आहे. शासनाच्या तिजोरीत जनतेचे पैसे आहेत. आम्ही मालक नाही तर सेवक आहोत. जनता ठरवते कोणाला उचलायचे आणि कोणाला आपटायचे? त्यामुळे जनतेच्या पैशावर अधिकार कोणीही सांगू नये, अशी सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ग्रामविकास मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे नाव न घेता केली.
पंढरपूर येथील टिळक स्मारक येथे भव्य मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित भगीरथ भालके-अनिल सावंत, नगराध्यक्षा डॉ. प्रणिता भालके, नगरसेवक, पंचायत समिती सदस्य व जि.प. सदस्य यांनी शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश केला. यावेळी ते बोलत होते. यावेळी रोजगार हमी मंत्री भरत गोगावले, आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, खा. धैर्यशील माने, खा. ज्योती वाघमारे, माजी मंत्री डॉ. तानाजी सावंत, माजी आमदार शहाजीबापू पाटील, माजी आ. सिद्धराम म्हेत्रे, पै. चंद्रहार पाटील, महेश साठे, संतोष सुळे यांच्यासह जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते.