सोलापूर : राज्य शासनाने चालू आर्थिक वर्षासाठी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना जाहीर केली आहे. जिल्ह्यात यंदा पावसाने दडी मारल्याने शेतकरी अजूनही पेरणीच्या प्रतीक्षेतच आहेत. त्यामुळे विमा कशाचा उतरवायचा, असा प्रश्न जिल्ह्यात आहे. दरम्यान प्रत्यक्षातील पिकांव्यतिरिक्त बोगस पीक विमा उतरविल्यास कारवाई केली जाणार आहे. डीबीटीद्वारे ‘नमो महासन्मान’सारखी योजना बंद करुन त्या शेतकर्यास ब्लॅक लिस्टमध्ये टाकले जाणार आहे.
यंदा भात, ज्वारी, बाजरी, नागली, मूग, उडीद, तूर, मका, भुईमूग, तीळ, कारळे, सोयाबीन, कापूस व खरीप कांदा या १४ पिकांसाठी खरीप हंगामातील विमा योजना आहे. शेतकऱ्यांना विमा संरक्षित रकमेच्या २ टक्के विमा हप्त भरून सहभाग घ्यावा लागेल.
कापूस व कांदा या नगदी पिकांसाठी हा विमा हप्ता विमा संरक्षित रकमेच्या ५ टक्के राहील. या शासन निर्णयामुळे अधिसूचित महसूल मंडळात चालू वर्षीचे सरासरी उत्पादन उंबरठा उत्पादनाच्या तुलनेत कमी आल्यास विमा नुकसान भरपाई लागू होणार आहे. केंद्र शासनाच्या राष्ट्रीय पीक विमा पोर्टल आणि बँक, सामूहिक सुविधा केंद्र किंवा स्वतः शेतकरी ऑनलाइन अर्ज भरून भाग घेऊ शकतात.
या १४ पिकांसाठी विमा
भात, ज्वारी, बाजरी, नागली, मूग, उडीद, तूर, मका, भुईमूग, तीळ, कारळे, सोयाबीन, कापूस व खरीप कांदा या १४ पिकांसाठी विमा असून त्याचा शेतकऱ्यांना ३१ जुलैपर्यंत या योजनेत सहभागी होणार आहे.
आधार क्रमांक खात्यास जोडावा
ॲग्रीस्टॅक नोंदणी क्रमांक (फार्मर आयडी) बंधनकारक आहे, जमिनीची कागदपत्रे, पीक लागवड घोषणापत्र, आधार क्रमांक, आधार संलग्न पेमेंटसाठी आधार क्रमांक बँक खात्यास जोडलेला असावा.