पंढरपूर : आषाढी एकादशीच्या सोहळ्याचे वेध लागले असून, विठुरायाच्या दर्शनासाठी लाखो भाविक पंढरपुरात दाखल होत आहेत. पंढरीत येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी प्रशासनासह श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
दर्शन रांगेतील भाविकांना उन्हापासून दिलासा मिळावा, यासाठी फॅन, कुलर तसेच विश्रांतीची व्यवस्था करण्यात आली आहे. यासोबतच नाश्त्यासाठी साजूक तुपातील शिरा, तांदळाची खिचडी आणि भाविकांसाठी पोटभर जेवणाचीही व्यवस्था मंदिर समितीच्या वतीने करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे, श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर हे स्वतः दर्शन रांगेत जाऊन भाविकांची आस्थेने विचारपूस करत आहेत. त्यांच्या अडचणी जाणून घेत आहेत. मंदिर समितीच्या वतीने करण्यात आलेल्या या सुविधांमुळे दर्शनासाठी आलेल्या वारकऱ्यांना मोठा दिलासा मिळत आहे.
"पंढरीत येणारा प्रत्येक वारकरी हा आमच्यासाठी व्हीआयपी आहे. यात्रा कालावधीत कोणताही व्यक्ती व्हीआयपी नाही, तर फक्त वारकरी हाच व्हीआयपी आहे. विठुरायाच्या दर्शनासाठी येणारा प्रत्येक भाविक आमच्यासाठी महत्त्वाचा असून, त्याची सर्वतोपरी सोय करण्याची जबाबदारी मंदिर समितीची आहे. कोणत्याही भाविकाची कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही, याची आम्ही पूर्ण काळजी मंदिर समिती घेत आहे.‘वारकरी हाच व्हीआयपी’ या भावनेतून पंढरीत भक्तिमय आणि सेवाभावी वातावरण निर्माण झाले आहे.