पंढरपूर : पुढारी वृत्तसेवा
मागील 70 वर्षांपासून प्रलंबित असणारा धनगर समाजाचा एसटी आरक्षण अंमलबजावणीचा प्रश्न उद्याच सुटावा व आमरण उपोषण स्थगित व्हावे. यासाठी धनगर समाजाचा वकील म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून तत्काळ निर्णय घेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगितले. पंढरपूर येथील टिळक स्मारक मैदानावर 9 सप्टेंबरपासून धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणी करण्यासाठी सुरू असलेल्या उपोषणाचा 14 वा दिवस आहे. या सहा उपोषणकर्त्यांना भेटून प्रकृतीची चौकशी करण्यासाठी आणि पाठिंबा पत्र देण्यासाठी
आ. शहाजीबापू पाटील आले होते. त्यावेळी ते बोलत हाते. आ. पाटील म्हणाले की, दर्या- खोर्यात, रानावनात आपल्या मेंढ्या घेऊन फिरणारा धनगर समाज हा माझ्या मतदारसंघात बहुसंख्येने आहे. मला त्यांच्या परिस्थितीची जवळून जाणीव आहे. स्वातंत्र्यापासून हा प्रश्न प्रलंबित पडला आहे. मुख्यमंत्री हे संवेदनशील असून संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील खिल्लारे कुटुंबाचे जे खाडाखोड करून मिळविलेले ‘धनगड’ नावाचे दाखले रद्द करण्याचा निर्णय घेणार असल्याचे सांगितले आहे.
तो रद्दचा आदेश तात्काळ व्हावा व मागील अनेक वर्षापासूनचा प्रश्न सुटावा, यासाठी मी त्वरीत मुख्यमंत्र्यांना भेटून या प्रश्नांची सोडवणूक करून निश्चित मार्ग काढणार असल्याचे आ. पाटील यांनी सांगितले. तर धनगडचे दाखले रद्दचा निर्णय घ्यावा, अन्यथा पाणी ही बंद करण्याचा इशारा या सहा उपोषणकर्त्यांनी दिला आहे. दरम्यान, सोलापूर जिल्ह्यातील सकल मराठा समाजाच्यावतीने एसटी आरक्षण अंमलबजावणीसाठी आमरण उपोषणास बसलेल्या आंदोलन लढ्यास सोलापूर जिल्ह्यातील सकल मराठा समाजाचा पाठिंबा असल्याचे पत्र पंढरपूरचे माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले.