पोखरापूर : देशाला स्वातंत्र्य मिळून 77 वर्षे उलटली, तरीही मोहोळ मतदारसंघातील अनेक गावांना पाणंद रस्ते उपलब्ध नाहीत. शेतापासून गावापर्यंत येण्यासाठी शेतकऱ्यांना गुडघाभर चिखलातून मार्ग काढावा लागतो. दळण-वळण, शेती विकास आणि दैनंदिन जीवनासाठी महत्त्वाचे असलेले पाणंद रस्ते तातडीने उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी हिवाळी अधिवेशनात आमदार राजू खरे यांनी मांडली.
हिवाळी अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी सभागृहात बोलताना मोहोळचे आमदार राजू खरे यांनी महाराष्ट्र शासनाचा महत्त्वपूर्ण नियम अध्यक्ष महोदयांच्या निदर्शनास आणला. शासकीय घरकुलासाठी शासनाकडून तीन ब्रास वाळू मोफत देण्यात येते; परंतु मोहोळ विधानसभा मतदारसंघातील एकाही घरकुल धारकाला ही वाळू आजतागायत मिळालेली नाही. त्यामुळे घरकुल बांधण्याची सर्व सामान्यांचे स्वप्न साकार होताना दिसत नाही. या अनियमिततेवर तातडीने कार्यवाही करून संबंधित लाभार्थ्यांना तीन ब्रास वाळू मिळावी, अशी ठाम मागणी सभागृहात आ.खरे यांनी केली. त्याचबरोबर मतदारसंघातील पानंद रस्त्यांच्या गंभीर समस्येकडे लक्ष वेधले. व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात ठेवलेल्या प्रस्तावाला पूर्ण पाठिंबा दर्शवित हा प्रस्ताव जनसामान्यांच्या हितासाठी अत्यंत आवश्यक व उपयुक्त असल्याचे मत मांडले.
जास्तीत जास्त निधी आणण्यासाठी प्रयत्न
मोहोळ विधानसभा मतदारसंघातील सर्व सामान्य शेतकऱ्यांचे प्रश्न, रस्त्यांचे प्रश्न, याबरोबरच मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि नागरिकांच्या मूलभूत सुविधांसाठी शासन दरबारी प्रयत्न करून जास्तीत जास्त निधी आणण्यासाठी प्रयत्न असल्याचे आमदार राजू खरे यांनी बोलताना सांगितले.