मळोली : नूतन वर्षाच्या पहिल्याच दिवशी अवकाळी पावसाने मळोलीसह परिसरात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस पडल्याने परिसरातील केळी, द्राक्ष, गहू, हरभरा व ज्वारी या पिकांचे अतोनात नुकसान झाले. अचानक आलेल्या या पावसाने शेतकरी पुन्हा एकदा नुकसानीत गेला आहे.
मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या पहिल्या दिवशी गुढी उभारत नवीन वर्षाचे स्वागत बळीराजाने मोठ्या दिमाखाने केले. मात्र दुपारी दोननंतर आकाशात ढग जमा झाले आणी ढगांनी अवकाळी पावसाचा संदेश दिला. त्याबरोबर सणाचा आनंद दु:खात गेला. मात्र पाच वाजता हलकेसे वारे वाहू लागल्याने आता पाऊस येऊ शकत नाही, असे अंदाज व्यक्त होत असतानाच संध्याकाळी सात वाजता पावसाचे थेंब पडू लागले आणि काढणीच्या बेतात आलेल्या गव्हाची रास डोळ्यासमोर भिजताना बळीराजाच्या डोळ्यात अश्रूंचे थेंब जमा झाले. मात्र अचानक आलेल्या या अस्मानी संकटास सामोरे जात शेतकऱ्यांनी मोठे नुकसान सहन केलं असून मळोली भागातील पश्चिम व पूर्व बाजूस गारांचा मोठा पाऊस पडला असून अनेक ठिकाणी गारांचा खच आढळून आला. केळी व द्राक्ष पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून गाव कामगार तलाठी गोरे, कृषी सहायक मदने हे सकाळपासून नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांचे पंचनामे करण्यात व्यस्त होते.
मळोली येथे उसाच्या क्षेत्राव्यतिरिक्त अनेक तरुण शेतकरी बांधवांनी केळी, द्राक्ष, शेवगा या बागा सुधारित पद्धतीने केल्या असून या झालेल्या अवकाळी पावसाने अनेकांच्या बागांचे नुकसान झाले आहे. ऊस हे पीक बहुतांश शेतकरी यांच्याकडे लागवड केलेले असून अनेक आडसाली उसाची पाने फाटून त्याचा पोत कमी झाला आहे. गुरुवारी रात्री पूर्वसंध्येला आलेल्या या पावसाने नुकसानीची मर्यादा ओलांडली आहे.