उत्तर सोलापूर : राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यामुळे मराठा समाजाच्या चार नोंदी रद्द झाल्या आहेत. सरकार मराठा समाजाविरुद्ध कटकारस्थान करत आहे. पण त्यांचे कटकारस्थान यशस्वी होऊ द्यायचे नाही. कोणत्याही परिस्थितीत कुणबी नोंदी रद्द होऊ द्यायच्या नाहीत, असे प्रतिपादन मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे यांनी केले. वडाळा (ता. उत्तर सोलापूर) येथे आयोजित केलेल्या सभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी महसूल मंत्री बावनकुळे, मंत्री संजय शिरसाट यांच्यावरही शेलक्या भाषेत टीका केली.
जरांगे हे पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. त्या दौऱ्यात आज दुपारी त्यांची वडाळा येथे सभा झाली. त्या सभेत त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. सभेच्या सुरुवातीला वडाळा ग्रामस्थांच्या वतीने सरपंच जितेंद्र साठे व ज्येष्ठ नेते बळीराम साठे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
राज्यात 58 लाख कुणबी नोंदी सापडल्या आहेत. त्यापैकी अनेक नोंदी रद्द करण्याचा घाट सरकारने घातला आहे. सरकारला मराठ्यांना पक्क आरक्षण द्यायचं नाही. पण सातारा, कोल्हापूर, औंध या गॅजेटनुसार मराठ्यांना पक्के आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. मराठ्यांची लेकरं अधिकारी बनले पाहिजेत. महसूल मंत्री बावनकुळे यांनी चार कुणबी प्रमाणपत्र रद्द केली आहेत. त्यांनी मराठा समाजात गैरसमज पसरवला आहे. गैरसमज पसरवण्यात सरकार यशस्वी झालेले आहे. पण मराठ्यांची नियत चांगली आहे. त्यामुळे वेळीच हे सगळं मराठ्यांच्या लक्षात आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीसांचे मंत्री बावनकुळे व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मंत्री शिरसाट यांनी मराठा समाजाचे वाटोळे करायचं ठरवलं आहे. मराठा समाजाच्या नोंदी रद्द करण्यात आलेले आहेत. याच वेळी त्यांनी फडणवीस आणि शिंदे यांना सुधारण्याचा सल्लाही दिला.
१४ जेसीबीच्या सहाय्याने पुष्पवृष्टी
वडाळा नगरीमध्ये जरांगे यांचे १४ जेसीबीच्या साह्याने पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले. उत्तर सोलापूर तालुक्यातील खेड, गुळवंची, कारंबा, अकोलेकाटी, नान्नज येथील समस्त मराठा समाजाने जरांगे यांचे स्वागत केले. नान्नज येथेही जेसीबीच्या साह्याने जरांगे यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली.